साखळी-चोर्ला घाट रस्त्याचे काम दर्जाहीन : थोडय़ाच दिवसांत डांबरीकरण झाले गायब,रस्त्यासाठी 11.89 कोटी रुपयांची निविदा
प्रतिनिधी /पणजी
सांखळी ते चोर्ला घाट रस्त्याच्या दर्जाहीन कामाची गंभीर दखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली असून याप्रकरणी चौकशीचा आदेश देतानाच राष्ट्रीय महामार्ग गोवा विभागाचे (बांधकाम खाते) असिस्टंट इंजिनिअर (एई) व ज्युनिअर इंजिनिअर (जेई) यांना निलंबित केले आहे. सदर रस्त्याची एकंदरीत हिशेब तपासणी (ऑडीट) करण्याचे निर्देश देण्यात आले असून तो खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसुल करावा, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आदेशात बजावले आहे.
सांखळी ते चोर्ला घाट या 27 कि.मी. रस्ता कामाचा आदेश 14 ऑगस्ट 2020 रोजी देण्यात आला होता. त्या कामासाठी एका वर्षाची मुदत देण्यात आली होती. 13 ऑगस्ट 2021 ही पूर्णत्वाची तारीख होती.
रस्त्यासाठी 11.89 कोटी रुपयांची होती निविदा
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम खात्यातील व इतर खात्यातील कंत्राटदार, सरकारी अधिकारी यांचे धाबे दणाणले आहेत. सांखळी ते चोर्ला घाट रस्ता कामासाठी सुमारे 11.89 कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
डांबरीकरण थोडय़ाच दिवसांत गायब
सांखळी ते केरी (10 कि.मी.) प्रथम टप्पा व केरी ते चोर्ला घाट (17 किमी) दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यात ते काम करण्यात आले. रस्त्याच्या वरचा थर थोडय़ाच दिवसांत गायब होऊन खालचा स्थर दिसू लागल्याने एकंदरीत कामाच्या दर्जाबाबत संशय बळावला आणि त्यातूनच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी चौकशी, करण्याचा आदेश बजावल्याचे सांगण्यात आले.
तीन वर्षांतील सर्व रस्त्यांची होणार तपासणी
मागील तीन वर्षात राज्यभरात ज्या मोठय़ा रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे, त्यांच्याही कामाचा दर्जा तपासण्यात येणार असून त्यामध्ये त्रुटी समोर आल्यास कारवाई करण्याचाही आदेश देण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.
पेडणे तालुका विकास समितीकडून स्वागत
सांखळी चोर्ला रस्ता निकृष्ट कामाबाबत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची तत्परता स्वागतार्ह असल्याचे पेडणे तालुका विकास समितीने म्हटले आहे. तथापी पत्रादेवी-करासवाडा राष्ट्रीय महामार्गाचे कामही निकृष्ट दर्जाचे झाले असून त्या बाबतही कठोर करावाई व्हावी. शिवाय बांधकाम कंपनी एमव्हीआर बाबत सरकारची नरमाईची भूमिका अयोग्य असल्याची टीका या समितीने नोंदवली आहे.
एमव्हीआर कंपनीला देखील सोडू नये : काँग्रेस
पत्रादेवी ते बांबोळी या राष्ट्रीय महामार्गाची देखील चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. एमव्हीआर कंपनीला देखील मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सोडू नये, असे पणजीकर यांनी म्हटले आहे.