ऑनलाईन टीम/ तरुण भारत
नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचं नाव देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे. तसेच एकनाथ शिंदेंनी समाजात भांडण लावल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनीच गेल्या वर्षी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. मात्र, यावरून स्थानिकांनी मोठा विरोध दर्शवल्यानंतर अखेर राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.विमानतळ प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक सर्व समाजातील लोकांना मातोश्रीवर बोलावून त्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा निर्णय जाहीर केला आहे.
भूमिपुत्रांची इच्छा होती. ती इच्छा आज उद्धव ठाकरेंनी पूर्ण केली आहे. आम्ही अनेकदा विनंती केली होती, पत्र पाठवलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व समाजाच्या लोकांना मातोश्रीवर बोलवलं आणि तुमची जी इच्छा आहे, भावना आहेत, त्यांचा सन्मान राखून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचं निश्चित केलं अशी माहिती त्यांनी दिली.
दि. बा. पाटील कोण होते
दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील यांचा जन्म रायगडच्या उरण तालुक्यातल्या जसई गावात झाला. एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या दि. बा. पाटील यांनी १९५१मध्ये वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर ते राजकारणात सक्रीय झाले. पीझंट्स वर्कर्स पार्टीशी ते संबंधित होते. १९५७ ते १९८० या काळात ते पाच वेळा पनवेलमधून आमदार म्हणून निवडून गेले होते. १९७७ ते १९८४ या काळात ते खासदार देखील होते. १९७२ ते १९७७ आणि १९८२-८३ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना अटक देखील झाली होती.
हेही वाचा- जबरदस्तीने बाहेर पाठवून गद्दारांचा शिक्का मारतायं; केसरकारांचा ठाकरे आणि राऊतांवर हल्लाबोल
एकनाथ शिंदेंच्या पत्रात नेमके काय होते मुद्दे
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं, असा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आला. डिसेंबर २०२०मध्ये राज्याचे नगरविकास मंत्री, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीच सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात CIDCO ला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात यावं, असा प्रस्ताव पाठवण्याची सूचना करण्यात आली होती.