ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यातील राजकीय घडामोडी पाहिल्या असता आज सकाळपासूनच राजकीय पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू असून काही वेळेपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर (Sambhajinagar) असे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला आहे. याशिवाय उस्मानाबाद (Usmanabad) शहराचे नावही धाराशिव (Dharashiv) केले जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासह दहा निर्णय मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या ‘संभाजीनगर’ नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याला मान्यता दिली. उस्मानाबाद शहराच्या ‘धाराशीव’ नामकरणास मान्यता दिली आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता दिली आहे.
राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे.
अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार असलेचेही या बैठकीत सांगण्यात आले.
ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय, यावेळी एकमताने मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ अनुसार आकारावयाच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे.