केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करेल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 2023-24 ची अंतिम मुदत आधी निश्चित करण्यात आली होती, परंतु कोविड-19 महामारीमुळे ती पुढे वाढवण्यात आली असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
सीआयएलचा एकंदर देशांतर्गत कोळसा उत्पादनातील वाटा पाहता तो 80 टक्क्यांहून अधिक आहे. जोशी येथे एका कार्यक्रमात म्हणाले, ‘कोविडमुळे पूर्वीचे उद्दिष्ट पुढे ढकलण्यात आले आहे. आम्ही आमचे एक अब्ज टनाचे स्वप्न पूर्ण करू आणि आम्ही कोळशाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ. कोल इंडिया 2025-26 पर्यंत एक अब्ज टन उत्पादनाचा टप्पा नक्कीच ओलांडेल, असा विश्वास आहे.’
ते म्हणाले की, सध्याला विविध प्लांट्समध्ये सरासरी 2.4 कोटी टन कोळशाचा साठा आहे आणि कोळशाचा दैनंदिन साठा वाढत आहे. ते म्हणाले, 31 मार्चपर्यंत, आमची योजना आगामी काळात किमान चार कोटी टन कोळसा साठवण्याची राहणार आहे. त्यासाठी योग्य ते नियोजन केले जात आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात 70 कोटी टन कोळसा आणि इतर स्त्राsतांकडून 20 कोटी टन अतिरिक्त कोळशाचे उत्पादन करणे अपेक्षित आहे.