राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्व’ सुरु केल्याबद्दल गौरव करण्याची मागणी; पुरस्काराबाबत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये केला ठराव
कोल्हापूर/ प्रतिनिधी
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी १८ एप्रिल २०२२ रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्व सुरु केले. या कृतज्ञता पर्वामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशातही राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची, त्यांनी केलेल्या समाज उपयोगी कायद्यांची जाणीव झाली. सोशल मिडियामध्ये गुरफटत चाललेल्या लहान मुलांनाही शाहू महाराजांचा इतिहास समजला. लोकराजाच्या कार्याची व्याप्ती त्यांना समजली. त्यामुळे कर्तव्यदक्ष, शाहू अनुयायी असलेले जिल्हाधिकारी रेखावार यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्यावतीने त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशा मागणीचे पत्र हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आले. या पत्रासोबत माणगाव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा ठराव जोडला आहे.
राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्वाच्या पार्श्वभूमीवर संस्कार वाहिनी व सार्वजनिक घोषणा प्रणालीवरून गावांच्या सर्व वाड्यावस्त्यांनवर दौंडी देवून याबाबत जनजागृती करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायती, प्राथमिक, माध्यमिक शाळा याठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये सर्व गावातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचे कुटुंब व तरूण मंडळातील कार्यकर्ते, बचतगटाच्या महिला, शेतकरी गटातील सदस्य, सर्व सहकारी संस्थातील सभासद, गावातील घटकनिहाय कर्मचारी सहभागी झाले होते. परिणामी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची नवीन पिढीला माहिती झाली. त्यामुळे शासनाने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या कार्याची दखल घेऊन विशेष पुरस्काराने गौरव करावा अशी मागणी माणगाव ग्रामपंचायतीसह जिल्ह्यातील शाहूप्रेमी जनतेकडून होत आहे.