वृत्तसंस्था/ मधेपुरा
बिहारमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कारमुळे मोठी दुर्घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर जिल्हाधिकाऱ्यांच्या कारने अनेक लोकांना चिरडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारने दरभंगा येथून मधेपुराच्या दिशेने जात असताना एक महिला आणि तिच्या मुलीला चिरडले. यानंतर देखील ही अनियंत्रित कार तेथे थांबली नाही. महामार्गाच्या कडेला काम करत असलेल्या दोन कामगारांनाही या कारने धडक दिली. दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि चालकाने पळ काढला आहे.
रस्त्यावर पेंटकाम करणारा एक मजूर, एक महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी आणि त्यांचे सहाय्यक कर्मचारी फरार झाले. जिल्हाधिकारी विजय प्रकाश मीणा हे दरभंगा येथे कारने परतत होते. या कारने प्रथम एका मजुराला चिरडले होते. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात कार अनियंत्रित होत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या महिला आणि तिच्या मुलीला जाऊन धडकली. यात दोघींचा मृत्यू झाला. दुर्घटनेप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास जिल्हा प्रशासनाने असमर्थता दर्शविली. दुर्घटनेतील जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरूनही संशय निर्माण झाला. दुर्घटनेवेळी कारमध्ये जिल्हाधिकारी, चालक, सुरक्षारक्षक आणि युवती होती.