मीटरसक्तीचा बडगा : भाडेदर नंतर ठरविण्याचा निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत ऑटोरिक्षा मीटरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून यापुढे रिक्षांना मीटर सक्तीचे असणार आहे. चालकांनी नियमांचे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी केली.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, प्रादेशिक परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.
आधी मीटरचा वापर सुरू करा, त्यानंतरच भाडेदर निश्चित करण्यात येईल. सध्या एका किलोमीटरला किमान 25 रुपये भाडे आहे. मात्र, काही रिक्षाचालकांनी मनमानी भाडेवसुली सुरू केली आहे. अशा चालकांविरुद्ध कारवाई करून ऑटोरिक्षा जप्त करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱयांनी दिला. ऑटोरिक्षाबाबत नागरिकांकडून रोज तक्रारी येत आहेत. दीड कि.मी.साठी 150 ते 200 रुपये भाडे आकारले जात आहे. हे चुकीचे आहे. प्रत्येक ऑटोरिक्षा चालकाने मीटर लावावे, मीटरप्रमाणेच भाडे आकारावे, रात्रीच्यावेळी तर परिस्थिती खूपच गंभीर आहे. भाडे ऐकूनच प्रवासी वैतागून जातात. ही लूट बरी नाही, असेही त्यांनी बैठकीत सांगितले आहे.
मनमानी भाडेवसुली करणाऱया रिक्षाचालकांचा परवाना रद्द करून त्यांची रिक्षा जप्त करण्यात येईल, असा इशारा देतानाच ऑटोरिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱयांनी आपल्या चालकांना यासंबंधी सूचना द्यावी. मीटर लावण्यास सुरुवात झाल्यानंतरच भाडेदर निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आता तरी ऑटोरिक्षांना मीटरसक्ती होणार का?
गेल्या दहा वर्षांपासून मीटर सक्तीसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रिक्षाचालक या प्रयत्नांना प्रतिसाद देत नाहीत, अशी स्थिती आहे. यापूर्वी खराब रस्त्यांचे कारण देऊन मीटरसक्ती टाळण्यात येत होती. आता पुन्हा जिल्हाधिकाऱयांनी मीटरसक्तीचा विषय उचलून धरला आहे. आता तरी ऑटोरिक्षांना मीटरसक्ती होणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.