कराड शहराचे महापुरापासून होणार संरक्षण; गॅबियन पद्धतीची भिंत होणार
देवदास मुळे/ कराड
गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या येथील कोयना नदीकाठच्या संरक्षक भिंतीच्या कामास प्रारंभ झाला आहे. कोयना नदीकाठापासून प्रीतिसंगमापर्यंत सुमारे 1 किलोमीटर अंतराची भिंत होणार असून यामुळे कराड शहराचे महापुरापासून संरक्षण होणार आहे. हे काम मार्गी लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकालात कराडच्या संरक्षक भिंतीच्या कोयनाकाठच्या दुसऱया टप्प्यासाठी सुमारे 20 कोटींचा निधी मंजूर झाला होता. ही भिंत मंजूर होण्यासाठी तत्कालीन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले होते. ही भिंत मंजूर झाल्यानंतर शनिवार पेठेतील कोयनेश्वर मंदिराजवळ भिंतीचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी 20 कोटींच्या गॅबियन भिंतीऐवजी काँक्रिटची भिंत बांधण्याच्या सूचना अजितदादांनी केल्या होत्या. त्यामुळे या भिंतीचा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. तो सुमारे 120 कोटेंचा होता. भिंतीसाठी मोठा निधी लागणार असल्याने हे काम रखडले होते. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता जाऊन भाजपची सत्ता राज्यात आली. 2019 मध्ये महापुराचा मोठा तडाखा बसला होता. त्यावेळी या भिंतीच्या मागणीने उचल खाल्ली होती. त्यामुळे तत्कालीन युतीचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी प्रशासनास गॅबियन भिंत बांधण्याच्या सूचना करत टेंडर काढण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनीही याबाबत शासनास गॅबियन भिंत बांधण्याबाबत पत्र दिले होते. त्यावेळी निविदा काढण्यात आली होती. मात्र त्यास प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यामुळे हे काम रखडलेले होते. दीर्घकाळ काम रखडल्याने वेळोवेळी भिंतीच्या आराखडय़ात आवश्यक बदल करण्यात आले आहे.
2019 नंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गेल्यावर्षी या भिंतीसाठी नव्याने 31 मार्च 2022 रोजी टेंडर प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली होती. त्यांनी याबाबत टेंभू प्रकल्प विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पावसाळय़ापूर्वीच ही निविदा अंतिम होऊन इचलकरंजीच्या कागवाडे असोसिएटसला ही निविदा मिळाली आहे. पावसामुळे काम सुरू झालेले नव्हते. पाऊस थांबल्याने आता तातडीने या कामास जुन्या कोयना पुलाजवळ प्रारंभ करण्यात आला आहे. जुन्या कोयना पुलाजवळ शासकीय विश्रामगृहाच्या खालच्या बाजूस जेसीबीने जमीन सपाटीकरण करण्यात येत असून भिंतीसाठी दगडही आणण्यात आले आहेत. कामगारही आले असून काम सुरू झाले आहे. ही भिंत जुन्या कोयना पुलापासून भुईकोट किल्ल्यापर्यंत 1 किलोमीटर अंतराची होणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ ते नवीन कृष्णा पुलापर्यंतची भिंत यापूर्वीच गॅबियन पद्धतीने बांधून पूर्ण झाली आहे. आता कोयनाकाठाच्या बाजूने भिंत होणार असल्याने शहराचे महापुरापासून संरक्षण होणार आहे.
महापुराचे पाणी जिथून घुसते, तेथे होतेय भिंत
1976 सालच्या कृष्णा नदीच्या महापुराचा अपवाद वगळता आतापर्यंत कोयना धरणाचा विसर्ग आणि अतिवृष्टीमुळे कोयना नदीच्या महापुरापासून शहराचे जास्त नुकसान झाले आहे. कोयना कॉलनी, दत्त चौक, पाटण कॉलनी या भागातून महापुराचे पाणी शहरात प्रवेश करते. त्यामुळे आता या भागात भिंत होणार असून sंप्रामुख्याने शनिवार पेठ, शुक्रवार पेठ व सोमवार पेठेच्या भागाचे महापुरापासून संरक्षण होणार आहे.
गॅबियन भिंतीने पूरसंरक्षण होईल-आर. वाय. रेड्डियार
कराडमध्ये अगोदरच कृष्णा नदीकाठी गॅबियन भिंत बांधलेली आहे. या भिंतीचा रिझल्ट आतापर्यंत चांगला आहे. पूरसंरक्षणासाठी गॅबियन भिंतीच बांधल्या जातात. शिवाय आर्थिकदृष्टय़ाही ती परवडणारी आहे. खोदकाम जास्त करावे लागत नसल्याने काँक्रिटचा खर्चही वाचतो. कराडच्या नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. कोयना नदीकाठी शासकीय विश्रामगृहाच्या मागच्या बाजूस काम सुरू केले आहे. कामाची मुदत दोन वर्षे आहे, अशी माहिती टेंभू उपसा सिंचन प्रकल्प ओगलेवाडीचे कार्यकारी अभियंता आर. वाय. रेड्डियार यांनी दिली. त्यांना गॅबियन पद्धतीच्या संरक्षक भिंतीच्या कामाचा मोठा अनुभव आहे. या कामासाठी सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.