288 जिल्हय़ांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य होणार : ग्राहकांना विश्वासाहर्ता पडताळता येणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
1 जूनपासून सोन्याच्या हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा सुरु झाला असून आता 256 जुन्या जिल्हय़ांसह 32 नवीन जिल्हय़ांमध्येही हॉलमार्किंग सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. यामुळे आता सर्व 288 जिल्हय़ांमध्ये सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. या जिल्हय़ांमध्ये आता 14, 18, 20, 22, 23 आणि 24 कॅरेटच्या दागिन्यांची विक्री होण्याची शक्यता आहे. हॉलमार्किंगनंतरच सदरचे दागिने विकता येणार आहेत. आता आपण हॉलमार्किंग व त्यांच्याशी संबंधीत बाबीची माहिती करुन घेणार आहोत.
काय आहे हॉलमार्किंग ?
हॉलमार्क सरकारी गॅरंटी असते. हॉलमार्क भारताची एकमेव अशी एजन्सी ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डस्(बीआयएस) देत आहे. हॉलमार्किंगमध्ये कोणत्याही उत्पादनाचे मापदंड प्रमाणित केले जाते. बीआयएस ही अशी संस्था आहे, की जी ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणाऱया सोन्याची पडताळणी करते. सोन्याची नाणी किंवा दागिने यावर हॉलमार्कसोबत बीआयएसचा लोगो असणे आवश्यक असून यावरुन सोन्याची शुद्धता निश्चित होत असल्याचे स्पष्ट होते.
सर्वसामान्य लोकांना काय फायदा?
यामध्ये सर्वसामान्य लोकांना फायदाच आहे, कारण आतापर्यंत ज्वेलरीची खरेदी करण्यासाठी काही लोकांना हे माहितीच नाही कि त्यांचे सोने किती प्रमाणात शुद्ध आहे. यात त्यांची फसवणूक होण्याची शक्यताही असते. यातून बनावट सोने व दागिन्यांचा व्यापार केला जाण्याची भीती अधिक आहे. हॉलमार्किंगमुळे ही भीती न राहता यामधून दिलासा मिळत चांगले व शुद्ध सोने खरेदीचा मार्ग ग्राहकांसाठी यामुळे मोकळा होतो.
मार्किंगमुळे नव्या ज्वेलरीच्या किमतीवर परिणाम होणार?
इंडिया बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सेक्रेटरी सुरेंद्र मेहता यांनी म्हटले आहे, की हॉलमार्किंग लागू झाल्यावर ज्वेलरीच्या किमतीवर थोडय़ा प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. यात काही प्रमाणात किमती वाढण्याची शक्यता राहणार असल्याचेही मेहता यांनी स्पष्ट केले.