टाटा मोटर्सने व्यक्त केला विश्वास
वृत्तसंस्था/ मुंबई
दोन वर्षांच्या मंदीनंतर, व्यावसायिक वाहन उद्योग चालू आर्थिक वर्षात चांगली कामगिरी दाखवेल अशी अपेक्षा टाटा मोटर्सने व्यक्त केली आहे. यावेळी व्यावसायिक वाहन उद्योगातील सर्व विभागांमध्ये मागणी मजबूत होत असून आगामी काळातही ती अशीच वाढती राहणार असल्याचा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.
टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ यांनी यावेळी ट्रकची मालिका सादर करताना सांगितले की, मागणी वाढत असल्याने येत्या काळात व्यवसायाला भक्कमता प्राप्त होणार आहे.
कंपनीने सीएनजीवर चालणाऱया मध्यम आणि अवजड व्यावसायिक ट्रकची देशातील पहिली श्रेणी सादर केली आहे. यासोबतच प्रगत मध्यम आणि हलके व्यावसायिक वाहन टिप्पर आणि ट्रकची नवीन श्रेणीही बाजारात दाखल करण्यात आली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यावेळी वाघ म्हणाले की, दोन वर्षांच्या मंदीनंतर 2021-22 या आर्थिक वर्षात व्यावसायिक वाहन उद्योगाने 22 टक्के वाढ नोंदवली आहे. ‘व्यावसायिक वाहन उद्योग आता वाढत आहे. वाहन वापराचे दर आणि मालवाहतुकीचे दर, अगदी ट्रान्सपोर्टर कॉन्फिडन्स इंडेक्स यांसारखे विविध निर्देशांक अतिशय चांगल्या स्थितीत आहेत.’ असल्याचेही स्पष्ट केले आहे.