प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेचे कचरावाहू वाहन जाळल्याप्रकरणी म. ए. समितीच्या सहा कार्यकर्त्यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली आहे. कृष्णा शट्टूप्पा गडकरी रा. उचगाव, मोहन परशराम पाटील, अनिल लक्ष्मण कदम, शिवाजी धाकलू चौगुले, मारुती वैजू पाटील आणि लक्ष्मण यल्लाप्पा पाटील सर्व रा. सुळगा-हिंडलगा अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.
महापालिकेचे वाहन क्र. केए 22 बी 9136 हिंडलगामार्गे तुरमुरी येथील कचरा डेपोकडे दि. 6 ऑक्टोबर 2014 रोजी सायंकाळी 5.30 वाजता कचरा वाहतूक करत होते. या वाहनातील कचरा सुळगा गावामध्ये रस्त्यावर पडत होता. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर वरील संशयितांसह इतरांनी ते वाहन अडवून त्याची तोडफोड केली आणि त्या वाहनाला पेटवून दिले, असा त्यांच्यावर आरोप होता.
या घटनेत वाहनाचे नुकसान झाले. याप्रकरणी वरील 6 जणांसह इतर काही अज्ञातांवर काकती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काकती पोलिसांनी दोषारोप दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी येथील जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात झाली. त्याठिकाणी सबळ पुराव्याअभावी या सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. सुधीर चव्हाण यांनी काम पाहिले.