बर्मिंगहम / वृत्तसंस्था
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेला आजपासून (गुरुवार दि. 28) प्रारंभ होत असून येथील अलेक्झांडर स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळा रंगणार आहे. मागील 20 वर्षातील कालावधीत युनायटेड किंगडमने स्पर्धेचे आयोजन करण्याची ही तिसरी वेळ असेल. राष्ट्रकुल कार्यकारिणीत 56 देशांमधून 72 सदस्यांचा समावेश आहे. मात्र, 56 देशांमधून नवे यजमान शोधण्याच्या राष्ट्रकुल कार्यकारिणीच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि यामुळे पुन्हा एकदा युकेला यजमानपद बहाल केले गेले.
यंदाच्या यजमानपदासाठी बर्मिंगहमचा प्रस्ताव खूपच उशिराने दाखल झाला. त्यापूर्वी, 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेने ही स्पर्धा भरवण्यास असमर्थता दर्शवली होती. 2012 लंडन ऑलिम्पिकनंतर युकेमधील ही राष्ट्रकुल स्पर्धा सर्वात मोठी व सर्वात महागडी स्पर्धा ठरण्याचे संकेत आहेत.
वास्तविक, भारतीय संघ स्पोर्टिंग सुपरपॉवर ठरण्यापासून बराच दूर आहे. मात्र, यानंतरही पहिल्या पाचमध्ये येण्याचे लक्ष्य साध्य होणार का, हे पहावे लागेल. भारताने 2002 पासून सातत्याने नेमबाजीच्या बळावर किमान पहिल्या पाचमध्ये स्थान संपादन केले. पण, यंदा नेमबाजीला राष्ट्रकुलमधून वगळले गेले असल्याने भारताला याचा धक्का बसू शकतो.
4 वर्षांपूर्वी गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जिंकलेल्या 66 पदकातील 25 टक्के वाटा नेमबाजीचा होता. पण, आता नेमबाजीला वगळले गेले असल्याने ती कसर भारताला अन्य खेळातून भरुन काढावी लागेल. वेटलिफ्ंिटग, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, कुस्ती व टेबलटेनिसमध्ये भारताला बरीच पदके जिंकता येतील. पण, नेमबाजीइतके धवल यश मिळवणे अर्थातच आव्हानात्मक असणार आहे.
72 वर्षांमध्ये भारताला ऍथलेटिक्समध्ये केवळ 28 पदके
राष्ट्रकुल स्पर्धेच्या 72 वर्षांच्या इतिहासात भारताला ऍथलेटिक्समध्ये आजवर जेमतेम 28 पदके जिंकता आली असून यंदा संघाला डार्क हॉर्स म्हणून ओळखले जात आहे. मात्र, अगदी अंतिम क्षणी ऑलिम्पिक सुवर्णजेता नीरज चोप्राने माघार घेतली असल्याने भारतासाठी हा मोठा धक्का ठरला.
‘नीरज ऍथलेटिक्स संघाचे नेतृत्व भूषवणार होता आणि साहजिकच, त्याची हजेरी आमच्यासाठी विशेष मोलाची होती. पण, तो येथे नसेल, हे आता निश्चित असल्याने अन्य ऍथलिट्सवरील जबाबदारी वाढली आहे. नेमबाजी नसल्याने त्याचा फटका बसेल. पण, अन्य इव्हेंट्सच्या माध्यमातून 7-8 आणखी पदके मिळवून त्याची भरपाई करता येऊ शकते’, असे वर्ल्ड चॅम्पियनशिप पदकजेती ऍथलिट अंजू बॉबी जॉर्ज म्हणाली.
कुस्तीत पदकांची लयलूट अपेक्षित, वेटलिफ्टर्सकडूनही अपेक्षा!
यंदा भारताने कुस्तीत 12 स्पर्धक उतरवले असून यात विद्यमान विजेते विनेश फोगट व बजरंग पुनिया यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यापूर्वी गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय मल्लांनी 5 सुवर्णपदकांसह एकूण 12 पदके जिंकली होती. यंदाही पदकांची खरी लयलूट याच क्रीडा प्रकारातून अपेक्षित असणार आहे.
याशिवाय, 4 वर्षांपूर्वी 5 सुवर्णपदकांसह 9 पदके जिंकणाऱया वेटलिफ्टर्सकडून भारताला यंदाही भरीव अपेक्षा असतील. मीराबाई चानूकडे वेटलिफ्टिंग पथकाचे नेतृत्व असेल. यानंतर बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूच्या नेतृत्वाखाली भारतीय बॅडमिंटन पथक महिला एकेरी, पुरुष एकेरी, महिला दुहेरी, मिश्र सांघिक गटात कडवे आव्हान उभे करेल. हॉकीमध्ये गोल्डकोस्ट स्पर्धेत रिकाम्या हातांनी परतावे लागलेल्या पुरुष व महिला संघाला येथे पोडियम फिनिशची अपेक्षा असेल.
टेबलटेनिसमध्ये गोल्डकोस्ट पदकतालिकेत भारतीय संघ अव्वलस्थानी राहिला होता. त्यावेळी 8 पैकी 4 पदके मनिका बात्राने जिंकली होती. वरिष्ठ खेळाडू शरथ कमलसाठी यंदा ही पाचवी व कदाचित शेवटची राष्ट्रकुल स्पर्धा असेल. मुष्टियुद्धात अमित पांघल, लवलिना बोर्गोहेन, निखत झरीन यांच्या कामगिरीकडे लक्ष्य असेल. स्क्वॅशसारख्या बिगर-ऑलिम्पिक खेळातही भारताला विशेष अपेक्षा असणार आहेत.