वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) शनिवारी बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेत्यांचा सत्कार करून त्यांना रोख बक्षिसे प्रदान केली.
या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या खेळाडूंना प्रत्येकी 20 लाख रुपये तर रौप्यविजेत्याला 10 लाख व कांस्यविजेत्या खेळाडूंना प्रत्येकी 7.5 लाख रुपये देण्यात आले. या सत्कार सोहळय़ास आयओएचे कार्यकारी अध्यक्ष अनिल खन्ना, सरचिटणीस राजीव मेहता, खजिनदार आनंदेश्वर पांडे आणि बर्मिंगहममधील भारतीय पथकाचे प्रमुख राजेश भंडारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सत्कारप्रसंगी कार्यकारी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी पदकविजेत्या खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. या स्पर्धेत भारताचे बलस्थान असलेल्या नेमबाजी या क्रीडा प्रकाराचा समावेश नसतानाही भारताने 61 पदकांची कमाई करीत पदकतक्त्यात चौथे स्थान मिळविले. 2018 गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या याआधीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने फक्त नेमबाजीतच 16 पदके पटकावली होती. भारताने बर्मिंगहम स्पर्धेत 22 सुवर्ण, 16 रौप्य व 23 कांस्यपदके मिळविली. देशाबाहेर झालेल्या राष्ट्रकुलमध्ये चौथे स्थान मिळवित भारताने आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
‘राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदके जिंकून देशाचा गौरव वाढविताना 61 पदके पटकावली. नेमबाजी हे भारताचे बलस्थान आहे. पण या क्रीडाप्रकाराचा समावेश नसतानाही आपल्या खेळाडूंनी हे यश मिळविले, याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. या खेळाडूंना यशस्वी बनविण्यासाठी पडद्यामागे राहून कठोर परिश्रम घेतलेल्या सर्व प्रशिक्षकांचे आणि सहायक स्टाफचेही मी आभार मानतो. त्यांनी घेतलेले श्रम सार्थकी लागल्याचे पाहून आयओएला खूप आनंद झाला आहे. पुरस्कर्त्यांनी दिलेला पाठिंबा तसेच कार्यकारी अध्यक्ष अनिल खन्ना, खजिनदार आनंदेश्वर पांडे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. रोख पुरस्कार हे खेळाडूंच्या यशाची फक्त पोचपावतीच आहे, असे नव्हे तर त्यांनी निवडलेल्या खेळाला खऱया अर्थाने पाठबळ देणारी बाब आहे. आर्थिकदृष्टय़ा खेळाडू व त्यांचे कुटुंबीय सक्षम झाले तरच या क्षेत्रात त्यांना अपेक्षित यशापर्यंत झेप घेता येऊ शकते, ही त्यामागची भावना आहे,’ असेही राजीव मेहता म्हणाले.
पुढील राष्ट्रकुल स्पर्धात ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे 2026 मध्ये होणार आहे. त्यावेळी नेमबाजी व कुस्ती या क्रीडा प्रकारांचा त्यात समावेश करण्याबाबत भारताच्या भूमिकेबद्दल त्यांनी पुनरुच्चार केला. ‘या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी कुस्ती व नेमबाजी राष्ट्रीय फेडरेशन्सला लेखी कळविले आहे. नेमबाजीच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने याआधीच सीडब्ल्यूजीकडे त्याचा पाठपुरावा सुरू केला असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय कुस्ती फेडरेशननेही सीडब्ल्यूजी अध्यक्षांना समावेशासंदर्भात कळविले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत याबाबत चित्र स्पष्ट होईल,’ असे खन्ना म्हणाले. आयओएच्या अंतर्गत काराभाराबद्दल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने चिंता व्यक्त केली आहे, त्याबद्दलही खन्ना यांनी सांगितले. ऑलिम्पिक चळवळीच्या नियमांचे पालन करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला असून त्याबद्दल आंतरराष्ट्रीय समितीने काळजी करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.
त्याआधी मेहता, खन्ना, पांडे व टीम इंडियाचे राष्ट्रकुल चीफ डी मिशन राजेश भंडारी यांनी राष्ट्रकुल क्रिकेटमध्ये रौप्य जिंकलेल्या महिला क्रिकेट संघांचीही भेट घेतली. महिला क्रिकेटच्या या पदार्पणाच्या स्पर्धेत ऐतिहासिक रौप्य जिंकल्याबद्दल या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. या यशाने महिला क्रिकेटची लोकप्रियता आणखी वाढीस लागेल, हे निश्चित, असेही ते म्हणाले. याप्रसंगी कर्णधार हरमनप्रीत कौर, प्रशिक्षक रमेश पोवार, व्यवस्थापक मारूफ फजनदार यांनी या पदाधिकाऱयांची चर्चा केली.