वाकरे प्रतिनिधी
“होळीला पुरणपोळीचा नैवेद्य” अर्पण करण्याऐवजी “गोरगरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य” दाखवण्याचा अभिनव उपक्रम वाकरे (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी सलग २६ व्या वर्षी कायम ठेवला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभला.
पूर्वीपासून वाकरे येथील ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरासमोर सामुदायिक आणि सार्वजनिक होळी पेटवण्याची प्रथा आहे.त्यासाठी संपूर्ण गावातून गोवऱ्या जमा करून होळी पेटवली जाते. त्यानंतर संपूर्ण गावातील व घराघरातील पुरणपोळ्या,भात, नारळ असा नैवेद्य होळीमध्ये अर्पण करण्याची परंपरा गावात होती. मात्र होळीत टाकल्या जाणाऱ्या नैवेद्यामुळे हजारो पुरणपोळ्या, भात आणि नारळांची नासाडी होते,म्हणून हा नैवेद्य गोरगरिबांना देण्यासाठी ग्रामस्थांचे परिवर्तन करण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व स.ब.खाडे महाविद्यालयाचे प्रा.एस.पी.चौगले यांनी २५ वर्षांपूर्वी घेतला. गेली सलग सव्वीस वर्षे यशस्वीपणे हा उपक्रम चालू आहे.यावर्षीही गावातील नैवेद्याच्या हजारो पुरणपोळ्या,भात,नारळ एकत्र करून रात्रीच गोरगरिबांना वाटण्यात आला. या अन्नाची नासाडी होण्याऐवजी हे अन्न गोरगरीब लोकांना दान करण्याचे पवित्र कार्य ग्रामस्थ करीत आहेत.
सरपंच अश्विनी पाटील,प्रा.एस.पी.चौगले,पोलीस पाटील सुरेश पाटील यांच्या हस्ते व चंद्रकांत पाटील,सदस्य विजय पाटील-माळी,लखन पाटील,राम पाटील,शिवाजी चौगले,आनंदा गुरव,आबासाहेब चौगले,नागेश शिंदे,दाजी पाटील,बळी पाटील, युवराज शिंदे,आनंदा देवरे,राऊसो चौगले,मारुती चौगले,मोहन पाटील,प्रितम चौगले,बाबुराव कांबळे यांच्या उपस्थितीत पुरणपोळ्या व नैवेद्य वाटप करण्यात आला.