जिल्हाधिकाऱयांना ग्रामस्थांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
नुकत्याच झालेल्या पावसामुळे माविनकट्टी येथील अनेक घरे कोसळली आहेत. मात्र पाहणी करण्यासाठी कोणी अधिकारीही आला नाही. याचबरोबर कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही बेघर झालो आहे. तरी तातडीने आम्हाला घरांसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी माविनकट्टी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माविनकट्टी गावामध्ये जवळपास 15 हून अधिक घरे कोसळली आहेत. पावसामुळे हे नुकसान झाले आहे. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. ग्राम पंचायत अधिकारी फिरकलेही नाहीत. त्यामुळे समस्या निर्माण झाली असून तातडीने घरे मंजूर करावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाबू पाटील, विनायक बस्सापूर, शंकरगौडा पाटील, हणमंत गडद, गदगय्या कुंडनीवर, अडवय्या परप्पण्णावर यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.