सर्पदंशाच्या घटनांचा, उपचाराचा आढावा घेण्यासाठी अभ्यास समिती
90 दिवसात शिफारशी सादर होणार
कोल्हापूर/सुधाकर काशीद
सर्पदंशाच्या वाढत्या घटना, सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण या पार्श्वभूमीवर सर्पदंश, सर्पदंशाच्या ठिकाणची परिस्थिती, उपचार व सर्पदंश झालेल्याला नुकसान भरपाई यावर अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने एक समिती स्थापन केली आहे. त्यात राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांसह सर्पदंश उपचार तज्ञ, सर्प तज्ञांचा समावेश आहे. राज्यात प्रथमच अशा पद्धतीने सर्पदंशाच्या घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
सर्पदंश झालेल्यांना नुकसान भरपाई कशी देता येईल या अंगाने देखील या समितीने अभ्यास करावयाचा आहे. त्यामुळे जर सर्पदंश झालेल्यांना वनविभागामार्फत नुकसान भरपाईची शिफारस झाल्यास तो एक वेगळा निर्णय असणार आहे.अर्थात त्याचे नेमके स्वरूप अभ्यास समितीच्या शिफारशीनंतर स्पष्ट होणार आहे.
साप हा मानवाचा मित्र आहे.निसर्ग साखळीतील तो एक महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक साप चावतोच किंवा चावलेला प्रत्येक साप विषारी असतो असे नाही. पण सर्पदंश हा धोकादायक असतोच. वर्षाला राज्यात साधारण 40000 जणांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. त्यामुळे सापाबद्दलचे गैरसमज कायम आहेत पण वन विभाग, सर्पमित्र, सामाजिक संघटनांनी त्याबद्दल सकारात्मक जनजागृतीही कायम ठेवली आहे.
महाराष्ट्रात डोंगराळ भाग वनक्षेत्र शेतीचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे शहरी भाग वगळता इतर भागात सापाच्या अधिवासासाठी पूरक असा परिवार आहे. शहरी भागाचा विस्तार होताना तिथेही माळरान, शेती क्षेत्राच्या जागेचा नव्या बांधकामासाठी वापर होत आहे. त्यामुळे या विस्तारित शहरी भागातही सापांचे अस्तित्व आहे.
या पार्श्वभूमीवर सर्पदंशाचे प्रमाण कायम आहे. मृत्यूचे प्रमाणही कायम आहे.आणि सर्पदंश हा तसा खबरदारी घेत टाळता येणारा पण ते वास्तवात शक्य नसणारा प्रकार आहे. त्यामुळे राज्याच्या महसूल व वन विभागाने यासाठी एका अभ्यास गटाच्या स्थापनेचा मंगळवारी निर्णय घेतला आहे. या समितीत राज्याचे मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) क्लेमेंट बेन, डॉक्टर निशिगंधा नाईक, सर्प तज्ञ केदार भिडे व श्री. मल्लिकार्जुन संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांचा समावेश आहे.
ही समिती राज्यातील सर्प दंशाच्या घटना व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांचे विश्लेषण करणार आहे. राज्यात सर्पदंश उपचार लसीची उपलब्धता, सर्प विष तपासणी केंद्र व सर्पदंश झालेल्यांना नुकसान भरपाईचे स्वरूप या संदर्भात आपल्या शिफारशी सादर करेल. 90 दिवसात समितीने शिफारस सादर करावयाची आहे.
वन्यजीव कायद्यांतर्गत सापाचा महत्त्वाच्या वन्यजीवांच्या यादीत समावेश आहे. वाघा इतकाच महत्त्वाचा दर्जा कोब्रा नागालाही आहे. वन्यजीव कायद्यानुसार त्याची नोंद असली तरीही इतर वन्यजीवापासून माणसाला जीवित किंवा वित्तहानी झाली तर जशी नुकसान भरपाई मिळते. तशी नुकसान भरपाई साप चावल्यानंतर मिळत नाही. ही समिती त्याच अनुषंगाने आपला अहवाल देणार आहे.
सर्प दंशावरील सर्व उपचार मोफत आहेत. त्याची लस ग्रामीण व शहरी अशा सर्व रुग्णालयात उपलब्ध ठेवली जाते. ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण अधिक आहे. छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळ, छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने उपचाराची तातडीने दक्षता घेतली जाते.
डॉ. व्यंकटेश पवार, सीपीआर
सापाबद्दल गैरसमज दूर करण्यास सर्पमित्रांचा वाटा अलीकडच्या काळात खूप मोठा आहे. कोल्हापुरात तर सर्पमित्र 24 तास उपलब्ध असतात. ते साप पकडतात व सुरक्षित जागी सोडून देतात. महापालिका अग्नीशमन दलाचे जवानही साप पकडतात. या दलाला रोज एक दोन फोन साप आला, तातडीने या अशा स्वरुपाचे असतात.