शिरोळ/प्रतिनिधी
सोयाबीन उन्हाळी हंगाम 2021 22 मध्ये आपल्या कृषी विद्यापीठाकडून प्रसारीत केलेले व महाबीज व कृषी केंद्रातून वितरित करण्यात आलेले केडीएस 726 या जातीचे सोयाबीन पिक पूर्ण वाया गेल्याने सदर पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुगे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी तालुका कृषी अधिकारी यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज या संशोधन केंद्रातून के डी एस 726 ही जात प्रसारित करण्यात आली आहे सदर जातीचे बियाणे सन 2021 -22 उन्हाळी हंगामासाठी महाबीज, इतर कंपन्यांच्या कडून बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रसारित करण्यात आले होते पण शेतकऱ्यांनी सदर सोयाबीनची लागवड करून आज चार महिने होत आले तरी पण सदर सोयाबीन पिकाची बेसुमार वाढ होऊन अत्यंत अल्प शेंगा लागलेल्या आहेत तसेच अजूनही चार महिने होऊन गेले तरी पीक हिरवे असून काढणीस आलेले नाही. ज्यां ठिकाणी काढणी केली आहे तेथे एकरी उत्पादन क्षमता 15 क्विंटल सांगितली होती पण प्रत्यक्षात दोन चार क्विंटल सुद्धा सोयाबीन उतारा पडत नाही अशा पद्धतीने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ यांनी सदरच्या बियाण्यांची योग्य चाचण्या घेऊन आपल्याकडील हवामान हंगामनिहाय उत्पादन हे पाहून प्रसारित करण्याचे होते पण शासनाचा सगळा आंधळा कारभार असल्यामुळे कृषी विद्यापीठाने आणि महाबिज सारख्या कंपन्यांनी हे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचा प्रयोग केलेला आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीस महाराष्ट्र शासन जबाबदार आहे त्यामुळे सदर शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे कृषी विभागाकडून तात्काळ पंचनामे करून झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी अन्यथा कृषी विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.