काझीरंगा पार्कमध्ये रात्री जीपसफारी केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा आणि सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग केल्याचा आरोप करणारी तक्रार दाखल झाली आहे. आसामच्या दोन कार्यकर्त्यांकडून नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार शमां आणि जग्गी वासुदेव यांनी शनिवारी सूर्यास्तानातंर काझीरंगा नॅशनल पार्क आणि व्याघ्र प्रकल्पात जीप सफारी केली, हा प्रकार वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
प्राण्यांची सुरक्षा आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्यासाठी एका ठराविक वेळेनंतर नॅशनल पार्कमध्ये सफारी केली जाऊ शकत नाही. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत ही तरतूद असल्याचे दोन्ही कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. काझीरंगा नॅशनल पार्क हे एक शिंग असलेल्या गेंडय़ांसाठी प्रसिद्ध आहे.
शर्मा, सद्गुरु जग्गी वासुदेव आणि राज्याचे पर्यटनमंत्री जयंत मल्ला बरुआ यांनी ठराविक वेळेनंतर नॅशनल पार्कमध्ये प्रवेश केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तर मुख्यमंत्री शर्मा यांनी आरोप फेटाळत आम्ही कुठल्याच कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे म्हटले आहे.
वन्यजीव कायद्यानुसार वॉर्डन रात्री देखील संरक्षित भागात प्रवेशाची अनुमती देऊ शकतो. कुठलाही कायदा रात्री अभयारण्यात प्रवेश करण्यापासून रोखत नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. आम्हाला सरकारने आमंत्रित केले होते. सरकारकडून या अभयारण्यातील प्रवेशाकरता सर्व आवश्यक अनुमती घेण्यात आल्या होत्या असे आमचे मानणे असल्याचे सद्गुरुंच्या ईशा फौंडेशनने म्हटले आहे.
वन विभागानेच सद्गुरु आणि मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले होते. याचमुळे त्यांनी रात्री पार्कमध्ये प्रवेश केल्याचे म्हणणे चुकीचे आहे. त्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक तयारी केली होती असे आसामचे मुख्य वनसंरक्षक एम.के. यादव यांनी सांगितले आहे.