कणेरीवाडी सरपंच व ठेकेदाराविरोधात तक्रार; ग्रामस्थांचे जि.प.प्रशासकांना निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील सरपंच व ठेकेदाराने बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाच्या 14 व्या वित्त आयोग निधीतून 3 लाख 4 हजार 478 रुपयांचा अपहार केला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्याकडे सोमवारी केली. या प्रकरणी सरपंच शोभा सुरेश खोत, ग्रामविकास अधिकारी रमेश कारंडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता रियाज रसूल व ठेकेदार सचिन पाटील यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखवार यांच्यासह पोलीसातही यासंदर्भात माजी सरपंच पांडूरंग खोत, बाजीराव खोत व बंडोपंत मोरे व ग्रामस्थांनी सोमवारी तक्रार दिली आहे.
निवेदनात म्हटले आहे, शासनाच्या 25/15 ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत 2017-18 मध्ये कणेरीवाडी येथे मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी 4 लाख 99 हजार 838 रुपये इतका निधी मंजूर झाला होता. या निधीमधून कणेरीवाडी येथील एका गल्लीत संजय मगदूम यांचे घर ते बजरंग पाटील यांच्या घरापर्यंत गल्लीतील दोन्ही बाजूस 64 मीटर लांबीची हाफ राऊंड गटर्स बांधकाम करण्यात आले होते. त्यानूसार सार्वजनिक बांधक विभागाने निविदा प्रसिध्द करुन ते काम पंकज मिरजे (कळंबे तर्फ ठाणे) यांच्याकडून पुर्णही करून घेतले. या कामाच्या बिलाची रक्कम मिरजे यांना आदा करण्यात येवून ग्रामपंचायतीकडे 18 मार्च 2019 रोजी कामाचे हस्तांतरणही करण्यात आले आहे.
तरीही सरपंच खोत, ग्रामसेवक कारंडे व ठेकेदार पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोगातून मिळालेलेल्या निधीतून याच गल्लीत 300 मीटर हाफ राऊंड गटर्स बांधकाम करण्यासंदर्भातील खोटी कागदपत्रे तयार केली. यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक घेण्यात आले. त्याच गल्लीतील रघूनाथ वाईंगडे यांचे घर ते महेश देसाई यांचे घरापर्यंत हाफ गटर्स बांधकाम करण्याचा प्रस्ताव पाठविला. या कामाची निवीदा काढून सचिन पाटील (पाटेकरवाडी) 28 मार्च 2019 रोजी काम पुर्ण केल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमताने 3 लाख 4 हजार 478 रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. संबंधीतांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निधी अपहार प्रकरणी यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल
कणेरीवाडी येथे शासकीय निधीचा अपहार झाल्याच्या यापुर्वी अनेक तक्रारी केल्या असल्याचे ग्रामस्थांनी प्रशासक चव्हाण यांना सांगितले. यावेळी चव्हाण यांनी या कामाची प्रत्यक्ष चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.