ऑनलाईन टीम/तरुण भारत
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) आज पार पडली आहे. पण, शिवसेनेनं व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे ३९ सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी दिली. तर शिंदे गटाकड़ून व्हीप जरी करण्यात आला होता. त्यांनीही १६ आमदारांनी व्हीप मोडला असल्याची तक्रार दिली आहे.
दरम्यान, शिवसेनेने (Shivsena) ३९ आमदारांविरोधात व्हिपचे पालन न केल्याने तक्रार दाखल केली आहे. तर शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या १६ आमदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवसेनेनं तातडीने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. तर शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिण्यात आले आहे. अध्यक्ष नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात भरत गोगावले यांचा शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष यांनी भरत गोगावले यांच्या पत्राचं अधिवेशनादरम्यान वाचन केलं.
सेनेच्या सर्व आमदारांना सुनील प्रभूंकडून व्हीप जारी
विधानसभा अध्यक्षांची निवडवणूक जाहीर होताच विधीमंडळाचे शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला होता. व्हीप जारी केल्याने एकनाथ शिंदे आक्रमक झाले होते. आमच्याकडे बहुमत असल्याने सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली होती.
लोकशाहीची पायमल्ली झाली
विधानसभा अध्यक्षांची निवडवणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडूनही शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. आमचा व्हिप झुगारून ३९ आमदारांनी विरोधात मतदान केलं. यामुळे लोकशाहीची पायमल्ली झाली हे महाराष्ट्राची १३ कोटी जनता विसरणार नाही आणि इतिहासात याची नोंद घेतली जाईल.” असं शिवसेना नेते शिवसेनेचे नेते सुनील प्रभू म्हणाले.
मतदारसंघातील शिवसैनिकांना काय तोंड दाखवाल
दरम्यान, आमदारांनी व्हीप मोडला आहे. आम्ही सभागृहामध्ये पत्र पटलावर आणले आहे. त्यावर योग्य ती कारवाई होईलच. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांच्या नैतिकतेची चाचणी घ्यायची होती. एकाही बंडखोर आमदाराने डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची हिंमत केली नाही. आज आमच्याकडे पाहून डोळे चोरले आहे. उद्या मतदारसंघामध्ये जाल तेव्हा शिवसैनिकांना काय तोंड दाखवाल, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.