कर्नाटकात पुन्हा एकदा 40 टक्के कमिशनचा मुद्दा मांडलेला असून त्यावर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फेऱया झडतील. तर दुसरीकडे सावरकरांवरील टीकेप्रश्नी काँग्रेसचे सिद्धरामय्या यांच्या वाहनांवर अंडीफेकची घटना घडलीय. गणेशोत्सवात सावरकरांच्या प्रतिमेचे प्रत्येक मंडपात पूजन करण्याचे भाजपने केलेले आवाहन पाहता राज्यात राजकारण ढवळून निघणार आहे, हे नक्की.
कर्नाटकातील राजकीय अस्वस्थता टिकून आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेली टीका, त्यानंतर कोडगू जिल्हा दौऱयावर असताना त्यांच्या वाहनावर झालेली अंडीफेक, काँग्रेसची ‘कोडगू चलो’ची हाक, स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मुद्दय़ावर सिद्धरामय्या यांनी रंभापुरी जगद्गुरुंची घेतलेली भेट आदी मुद्दे चांगलेच गाजत आहेत. याबरोबरच मांसाहार करून मंदिरात प्रवेश करावा की नाही? हा मुद्दाही भाजप व काँग्रेस नेत्यांमध्ये वादाचा ठरला आहे. अशा घडामोडींमुळे अस्वस्थ वातावरण असतानाच बुधवारी कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष डी. केंपण्णा यांनी कर्नाटक सरकारवर पुन्हा 40 टक्के कमिशनच्या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे. यासंबंधी येत्या पंधरा दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱयांदा पत्र पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
केंपण्णा हे कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष आहेत. बुधवारी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांची भेट घेऊन 40 टक्के कमिशनसाठी आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत कंत्राटदाराची कशी अडवणूक केली जात आहे, यासंबंधीची त्यांनी माहिती दिली आहे. 10 टक्क्मयांपासून 40 टक्क्मयांपर्यंत कमिशन दिले तरच केलेल्या कामाची बिले मंजूर होतात. कमिशनमुळे 22 हजार कोटी रुपये कंत्राटदारांचे येणे थकले आहे, असा आरोप अध्यक्षांनी केला आहे. बेळगाव येथील संतोष पाटील या कंत्राटदाराने 40 टक्के कमिशन दिले नाही म्हणून बिले थकविल्याचा आरोप करीत 12 एप्रिल 2022 रोजी उडुपी येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यावेळचे ग्रामीण विकास व पंचायत राजमंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे ईश्वराप्पा यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अलीकडेच तपास यंत्रणेने या प्रकरणातून त्यांना क्लीन चिट दिली आहे.
कंत्राटदार संघटनेच्या अध्यक्षांनी केलेल्या आरोपानंतर ‘केवळ आरोप करून चालणार नाही, पुरावे द्या, कारवाई करतो’ असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सरकारची भूमिका जाहीर केली आहे. या आरोपामागे काँग्रेसचा हात असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. आरोप-प्रत्यारोप काही असले तरी न्यायालयीन चौकशी झाली तर पुरावे देण्यासाठी आपण तयार आहोत, असे केंपण्णा यांनी सांगितले आहे. न्यायालयीन चौकशीच्या आधी जर पुरावे जाहीर केले तर संबंधित कंत्राटदारांना त्रास होऊ शकतो. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे सद्गृहस्थ आहेत. पण व्यवस्थेत त्यांचेही काही चालेना, असे केंपण्णा यांनी सांगितले आहे. यावरून प्रशासकीय व्यवस्थेची वाटचाल कोणत्या दिशेने चालली आहे? आगामी निवडणुकीत कोणकोणते मुद्दे निवडणूक प्रचारात कळीचे ठरणार, याची जणू ही झलकच म्हणावी लागेल. काँग्रेसने 40 टक्के कमिशनचा मुद्दा लावून धरण्याचे ठरविले आहे.
गेल्या आठवडय़ात दि. 18 ऑगस्ट रोजी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या हे कोडगू जिल्हय़ाच्या दौऱयावर होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांचा दौरा होता. यावेळी कुशालनगर तालुक्मयातील गुड्डेहोसूर येथे सिद्धरामय्या यांच्या कारवर अंडी फेकण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. आमदार अप्पाचु रंजन यांच्या पुढाकारातून या कार्यकर्त्यांना जामिनही मिळवून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, निजद नेते एच. डी. कुमारस्वामी आदींसह सर्व पक्षीय नेत्यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ 26 ऑगस्ट रोजी काँग्रेसने ‘मडिकेरी चलो’ची हाक दिली होती. पोलीसप्रमुखांच्या कार्यालयाला घेराव घालून शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरविण्यात आले होते. प्रशासनाने जमावबंदी आदेश जारी केल्याने काँग्रेसने हा कार्यक्रम रद्द केला आहे. याच काळात भाजपनेही ‘जनजागृती मेळावा’ घेण्याचे जाहीर केले होते. हा मेळावाही आता रद्द झाला आहे.
सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना टिपू सुलतान जयंती सुरू झाली. टिपू सुलतानच्या राजवटीत कोडगू जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात धर्मांतर आणि मंदिरांचा विध्वंस झाला आहे. कुर्गींची हत्या झाली आहे. त्यामुळे जयंतीला कोडगू जिल्हय़ातून मोठा विरोध झाला. तेव्हापासून सिद्धरामय्या यांच्या निर्णयावर कोडगू जिल्हय़ात असंतोष होता. शिमोगा येथील हिंदू कार्यकर्त्याची हत्या व त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेच्या अवमानानंतर सिद्धरामय्या यांनी मुस्लीमबहुल वसाहतीत त्यांची छबी लावलीच कशाला? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे सावरकरप्रेमी सिद्धरामय्यांवर कमालीचे संतापले आहेत. अंडीफेक करणारा संपत हा काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते. त्यानंतर संघाच्या गणवेशातील संपतची छायाचित्रे काँग्रेसने प्रसिद्ध केली.
या घटनेनंतर कर्नाटकातील अनेक ठिकाणी सावरकरांच्या प्रतिमांचा अवमान करण्यात आला. म्हणून गणेशोत्सवात प्रत्येक मंडपात सावरकरांची प्रतिमा पूजण्याचे आवाहन भाजप नेत्यांनी केले आहे. याला प्रत्युत्तर देताना प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमांचे मंडपात पूजन करणार, संगोळ्ळी रायण्णा यांच्या प्रतिमेचेही पूजन करावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवातही पुतळे व प्रतिमांवरून राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप उफाळणार आहेत.