परिसरातील व्यावसायिक, वकिलांसह नागरिकांची मागणी : काम कासवगतीने होत असल्याने नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जवळपास महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, अजूनही हे काम पूर्ण झाले नाही. अत्यंत कासवगतीने काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील व्यावसायिक, वकील आणि नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील खुल्या जागेमध्ये विकास करण्यात येत आहे. रस्त्याबरोबरच विविध इमारतींची उभारणी करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानंतर तातडीने रस्त्याच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. सतत गजबजलेल्या आणि अधिक रहदारी असलेल्या या रस्त्यावर खोदाई करण्यात आली. या परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. कामासाठी आलेल्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी लहान वाट करून देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
जुने जिल्हा पंचायत कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी खोदाई करण्यात आली. हे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता महिना उलटला तरी अजूनही अर्धवटच काम आहे. त्यामुळे साऱ्यांनाच समस्या निर्माण झाली आहे. वास्तविक रात्रंदिवस काम करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र, अत्यंत संथगतीने काम सुरू असल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.
वारंवार वाहतुकीची कोंडी
जिल्हाधिकारी कार्यालय तसेच न्यायालय आणि इतर सरकारी कार्यालये या परिसरात एकत्रच आहेत. त्यामुळे कामासाठी बेळगावच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक या ठिकाणी ये-जा करतात. येताना वाहने घेऊनच येतात. मात्र, त्यांना ये-जा करण्यासाठी वाट नसल्याने समस्या निर्माण होत आहे. पार्किंगलाही जागा नाही. त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. रहदारी पोलिसांवर त्याचा ताण पडत आहे. तेव्हा तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.