आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव यांच्या सूचना : शहरात 10 ठिकाणी कचऱ्यापासून बायोगॅसचा प्रकल्प उभारणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
शहरातील रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य झाले असून सर्व रस्ते तीन महिन्यांत पूर्ण करा, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. कचऱयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहरात 10 ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा निर्णयही यावेळी झाला.
शहरातील खराब झालेले रस्ते, थेटपाईपलाईन, कचरा समस्या आदी प्रश्नांसंदभांत आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका निवडणूक कार्यालयामध्ये बुधवारी बैठक घेतली. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची माजी पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, शहरात कचऱयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कचऱयावर प्रक्रियेचे विक्रेंद्रीकरण झाले पाहिजे. ज्या-त्या प्रभागा जवळच तेथील कचऱयाची विल्हेवाट लावली पाहिजे. शहरात यासाठी 10 ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारावेत. शहरालगतच्या प्रवेशद्वाराजवळील संबंधित गावातील रस्त्यावर कचरा पडलेला असतो. येथील कचरा व शहरातील कचऱयावर ग्रामिण भागातील शासकीय जागेत बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी शुक्रवारी 4 शिंगणापूर, नागदेववाडी, बालिंग येथे मनपा व ग्रामपंचायत यांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय झाला. उपनगरातील रस्त्यांचे सर्व्हे करून आराखडा करणे, 16 नोव्हेंबरपर्यंत पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे, कंत्राटी पद्धतीने सफाईसाठी 150 कर्मचारी नियुक्त करणे यावरही सकारात्मक चर्चा झाली. यावेळी माजी नगरसेवक सचिन चव्हाण, अर्जुन माने, निलोफर आजरेकर, सचिन पाटील, राजू लाटकर, संदीप नेजदार, सुभाष बुचडे, सुनिल पाटील, संजय मोहिते, अशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.
पॅचवर्क दर्जदार झाले पाहिजे
सध्या शहरात मनपाकडून करण्यात येणारी पॅचवर्कची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्यावरून माजी नगरसेवकांनी मनपा अधिकाऱयांना धारेवर धरले. मोठी खडी टाकून त्यावर डांबर टाकले जात असल्याने अपघात होत आहे. खड्ड्यात डांबर, बारीक खडी टाकून बेस तयार करून दर्जेदार पॅचवर्क करण्याची सूचना करण्यात आली.
खड्डे असताना वेगाने वाहन कसे चालवले
मनपा उपजल अभियंता जयेश जाधव यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फुलेवाडी रिंगरोवर प्रचंड खड्डे असताना ते वेगाने वाहने कसे चालवितील, असा सवाल काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी केला. खड्ड्य़ामुळेच जाधव यांच्या आईचा मृत्यू झाल्याचाही आरोप त्यांनी केला. शहरात यापूर्वी केलेले रस्ते दर्जदार होते. चार महिन्यांतच खराब होत आहेत. रस्ते करण्यापूर्वी सर्व कामे करून घ्यावीत. कोणत्याही विकास कामांची निविदा प्रक्रियेस 8 महिने लागतात. 15 दिवसांत प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, असेही देशमुख यांनी सांगितले.