‘मॅडम, अलीकडे गायत्रीचे काहीतरी बिनसले आहे. वेगळीच वागते. धड कशातच लक्ष नाही तिचे. मधेच अस्वस्थ असते. तर कधी खूप चिडचिड करते. खरंतर ती अशी नव्हती हो. काहीतरी बदल झाला आहे नक्की. परवा अचानक दुपारीच ऑफिसमधून आली. मानसी, तिची मुलगी खेळायला शेजारी गेली होती. मानसी घरी नाही हे पाहिल्यावर प्रश्न ची सरबत्ती सुरू झाली आणि तिकडे का गेली, पाठवलेच कुणी असे अनेक प्रश्न विचारले! मी ही वैतागले..जरा वादावादी झाली. मानसी घरी आल्यावर गायत्री तिला मिठी मारून रडूच लागली. सारं शांत झाल्यावर विचारलेही की ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? कामाचे प्रेशर आहे का? तर नाही हे एकच उत्तर..पण काहीतरी चुकतंय मॅडम..हल्ली नवीन काय पॅड तर मानसीला हॉलमध्येसुद्धा एकटीला बसू देत नाही. पोरीने जरा पंखा लावला आणि खुर्ची घेऊन बसली तर लगबगीने ही धावणार आणि म्हणणार..‘मनू..इथे नको तिथे बस..’ असे अनेक बाबतीत होते. मग मानसीही वैतागते, ‘आजी सांग ना गं आईला’ असे म्हणत माझ्याजवळ भुणभुण..”
“बरं. साधारपणे किती दिवस सुरू आहे हे?”
“गेला महिनाभर हे असंच सुरू आहे.” “तुम्ही मानसीच्या बाबांजवळ बोललात का याविषयी?” “हो चार दिवसांपूर्वीच बोलले. त्यांनाही गायत्रीमध्ये बदल जाणवतो. काहीवेळा आपल्यातच हरवल्यासारखी असते, कधी लक्षच नसतं..पूर्वीसारख्या गप्पा मारत नाही. पण त्यांनाही वाटलं कामाच्या दगदगीने असं होत असेल. त्यांनी बाकी काही चर्चा न करता दोन दिवस बदल म्हणून त्यांच्या मित्राच्या फार्म हाऊसवर जायचे ठरवले. गायत्री सुऊवातीला हो म्हणाली पण नंतर नको ते फार्म हाऊस म्हणत काही कारण न सांगताच बेतच पॅन्सल केला. एरवी हौशीने बाहेर पडणारी ही मुलगी. हिला काय झालं असेल हा प्रश्न त्यांनाही पडलाच आहे. त्यांनीही बोलायचा प्रयत्न केला तिच्याजवळ, परंतु ती काही नाही म्हणून विषयच बदलते. काय करावे कळत नाही. काहीतरी मनात आहे तिच्या”
“हो..तिच्याजवळ बोलावे लागेल. ती येईल का?”
“हो, मॅडम. मी तिला काल समोर बसवून शांतपणे समजावून सांगितले की हे जर असेच सुरू राहिले तर सगळा आनंद हरवून बसशील. आमच्याजवळ बोलता येत नसेल तर आपण दुसऱ्या कुणाची तरी मदत घेऊ. ती यायला तयार आहे”
ंं नंतर ठरल्या वेळेनुसार रीनाताई गायत्रीला घेऊन आल्या. तिच्याशी संवाद साधल्यानंतर बऱ्याच गोष्टी उलगडत गेल्या.
गायत्रीच्या ऑफिसमध्ये एक महिला होती..आवड म्हणून ती ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत होती. ऑफिसमधल्या काही लोकांनी तिला उत्सुकतेने आपापल्या पत्रिका दाखवल्या होत्या. काही जणांना तिने सांगितलेले अगदी पटले तर काही जणांच्या बाबतीत त्या गोष्टींचा दूरदूर संबंधही नव्हता. सहकाऱ्यांच्या आग्रहाने गायत्रीनेही आपल्या लेकीची पत्रिका तिला दाखवली. पत्रिकेवर नजर फिरवत बाकी सगळं छान आहे परंतु पंचवीसाव्या वषी हिला खूप जपायला हवं हं.
बस्स,.त्यानंतर मैत्रिणींमध्ये गंडांतर वगैरे विषयांची चर्चा सुरू झाली. अनेक उदाहरणे गायत्रीने ऐकली आणि ते सगळं तिच्या मनामध्ये एवढं बसलं की मनुला पाहिलं की तिला धस्स व्हायचं..खरंच हिला काही झालं तर?
तिचं मन तिला बजावायचं. गायत्री तू काय आणि कसले विचार करतेस? एक क्षण तिला वाटायचे या क्षेत्रातील कुणी तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा का? पुन्हा विचार यायचा. नको. परत त्यांनी तेच सांगितले तर? आणखीनच अवघड. तिच्या नवऱ्याचा या कुठच्याच गोष्टींवर यत्किंचितही भरवसा नव्हता. त्यामुळे त्याच्याजवळ कसं बोलणार..म्हणून ती शांत राहिली. परंतु महिनाभर आतल्या आत तिचा झगडा सुरू होता. हळूहळू स्वप्ने पडू लागली. जीव घाबरू लागला. गायत्रीला आता चिंता ग्रासू लागली होती. काहीवेळा ती प्रयत्नपूर्वक हे विचार बाजूला सारायची परंतु समोर मानसी दिसली की पुन्हा चक्र सुरू व्हायचे. ती पंख्याखाली बसली तर पंखा तर पडणार नाही ना, हा विचार तिला त्रस्त करायचा. मैत्रिणींनी सांगितलेले विविध किस्से मनात घर करून राहिले होते आणि ‘गंडांतर’ या एका शब्दाने तिची अलीकडे झोपही उडाली होती. गायत्रीला काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने समजावून सांगून मनात येणारा विचार हा केवळ विचार आहे याचे भान आणणे आवश्यक होते. समुपदेशन आणि विविध तंत्राचा सराव याच्या सहाय्याने गायत्री यातून बाहेर पडलीही. परंतु गायत्रीला असं काय झालं होतं? तर तिची भवितव्यातील सुरक्षितता नाहीशी झाली होती. गायत्री ऑफिसमधून आली आणि मानसी दिसली नाही की तिला वाटायचं..कुठे गेली ही? घराबाहेर पडायची काही गरज आहे का? काही झाले तर? ती कुठे पडली तर? अपघात झाला तर? या आणि यासारख्या वेगवेगळ्या विचारांची काल्पनिक भुतं तिला त्रास देत होती.
खरंतर चिंता हा माणसाच्या आयुष्यातील तसा एक अविभाज्य आणि स्वाभाविक घटक आहे. स्वाभाविक चिंता सावधानतेचा इशारा देते. जबाबदारीची जाणीव करून देते. वास्तविक चिंता ज्यावेळी विकृत चिंतेकडे वळते त्यावेळी असा गोंधळ होतो. पहा हं..वरच्या उदाहरणातील गायत्रीला तिच्या विश्वासानुसार मुलीवर ‘गंडांतर येणार’ म्हटल्यावर काळजी वाटली, स्वाभाविक आहे. परंतु समजा वयाच्या पंचवीसाव्या वषी हे ‘गंडांतर’ येऊ शकेल असे मानले तरी मुलीला जराही नजरेआड न करणे, ती दिसत नाही म्हटल्यावर जीव घाबराघुबरा होणे, अस्वस्थ वाटणे याची कारणे पाहिली तर आईला मुलीची वाटणारी स्वाभाविक चिंता इथे विकृत झाली होती.
इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भीती आणि चिंता यामधे एक महत्त्वाचा फरक आहे. समजा मी रस्त्याने चालत जात आहे. अचानक कुत्रा अंगावर धावून आला. तर एकदम छातीत धस्स होईल. अगदी तोंड कोरडंही पडेल. इथे निर्माण झाली ती भीती. संकट प्रत्यक्ष समोर उभे राहते तेव्हा आपल्याला वाटते ती भीती. परंतु चिंतेमध्ये आपल्यावर काहीतरी संकट कोसळेल असे उगीचच वाटत राहते.
भीती ही प्रत्यक्ष संकटावरील प्रतिक्रिया असते, तर चिंता ही संकटाची अपेक्षा असते असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. म्हणजे पहा, उद्या कसे व्हायचे हा विचार आपल्याला काम करायला, नियोजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. पण त्याचे रूपांतर जर चिंतेत झाले तर मात्र तो इतका त्रासदायक ठरतो की आजचे कामही हातून नीट होत नाही. प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो, अस्वस्थता येते. उद्याविषयक अंदाज बांधणे करायला हवे हे खरे परंतु भविष्याची निरर्थक चिंता करून मनाला पोखरणे हे आपले आपणच थांबवायला हवे. स्वत:च्या मनात डोकावत, विचार भावना न्याहाळात अविवेकी प्रतिक्रिया देण्यापेक्षा विवेकी प्रतिसादाकडे आपल्याला कसे जाता येईल यादृष्टीने प्रयत्न केले तर विकृत चिंतेपासून आपण स्वत:ला बाजूला ठेवू शकू हे मात्र खरे!!
-अॅड. सुमेधा संजीव देसाई