प्रतिनिधी /खानापूर
योग माणसाला परिपूर्ण बनवतो, योगामुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. आजच्या धावपळीच्या जगात योग हाच पर्याय असल्याचे मत अवरोळी मठाचे स्वामी चन्नबसव देवरू यांनी येथील मलप्रभा क्रीडांगणावर जागतिक योग दिन आचरणाच्या वेळी व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत सीआरसी शंकर कम्मार यांनी केले. राजकुमार कुंभार यांनी प्रास्ताविक करून योगदिनाबद्दल माहिती दिली.
शिक्षण खाते, योग गुरुकुल गोवा, लायन्स क्लब खानापूर, पतंजली योग मंडळ खानापूर यांच्यावतीने मंगळवारी पहाटे 6 वाजता मलप्रभा क्रीडांगणावर जागतिक योग दिनाचे आचरण करण्यात आले होते. यावेळी सातवी ते दहावीचे 1500 विद्यार्थी सहभागी झाले होते. आमदार अंजली निंबाळकर, नगराध्यक्ष मजहर खानापुरी, तहसीलदार प्रवीण जैन, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी, लायन्स क्लबचे अध्यक्ष मल्लाप्पा बेनकट्टी, पद्नाभ गुरुकुलचे योगशिक्षक वैजू गुरव, पतंजली योग मंडळाचे वसंत देसाई, रवि काडगी, फादर एलविन कार्दोस, मौलाना इम्तिहाज मकानदार उपस्थित होते.
यावेळी योग हा मानवतेचा संदेश देणारा आहे. जात, धर्मापलीकडे योग आहे. योगामुळे मानवता जोपासली जाते. हेच डोळय़ासमोर ठेवून योगदिनाच्या निमित्ताने धार्मिक सलोखा जोपासत, यासाठी फादर एलविन कार्दोस, मौलाना मकानदार, चन्नबसव देवरू यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर एक तास योगासने करण्यात आली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपाहाराचे वितरण करण्यात आले.