दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब : सरकारचे विरोधकांवर आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दोन्ही सभागृहात गोंधळाचे सत्र कायम राहिले. विरोधी सदस्यांच्या गदारोळातच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी मणिपूर मुद्यावर सरकार चर्चेला तयार असल्याची ग्वाही पुन्हा एकदा दिली. मात्र, विरोधकांनी गडबड-गोंधळ सुरूच ठेवल्यामुळे कामकाज लांबणीवर टाकण्यात आले आहे. सततच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज होत नसल्यामुळे सरकारने विरोधकांवर आरोप केले आहेत. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावरील चर्चेत आपले पितळ उघडे पडण्याच्या भीतीने विरोधक पळपुटेपणाचा मार्ग स्वीकारत असल्याचा हल्लाबोल सरकारच्यावतीने करण्यात आला आहे. मणिपूरमधील परिस्थितीवर विरोधी खासदारांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज प्रथम दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवार, 24 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाजही सुरुवातील दुपारी अडीच वाजेपर्यंत आणि नंतर 24 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही विरोधकांनी गदारोळ आणि घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. विरोधकांच्या गदारोळात मणिपूरमधील घटना निश्चितच अत्यंत गंभीर असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत स्पष्ट केले. तसेच पंतप्रधानांनी स्वत:ही यावर भाष्य करताना खेद आणि तिरस्कार व्यक्त केलेला असून हिंसाचाराच्या मुद्यावर सरकारची स्पष्टीकरण देण्याची तयारी असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, गडबड-गोंधळामुळे पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. विरोधकांच्या घोषणाबाजी आणि गदारोळामुळे सभागृह कामकाजात सातत्याने व्यत्यय निर्माण होत राहिला.
विरोधक गंभीर नाहीत : राजनाथ सिंग
मणिपूरच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झालेली आहे. त्यानंतर आता पुन्हा संसदेतही चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. पण काही राजकीय पक्ष विनाकारण येथे चर्चा होऊ नये अशीच परिस्थिती निर्माण करू इच्छितात. त्यांच्या या पवित्र्यावरून विरोधक मणिपूरबाबत तितके गंभीर नसल्याचा माझा स्पष्ट आरोप आहे, असे राजनाथ सिंग म्हणाले.
चर्चेत अडथळा आणण्याचा प्रयत्न : प्रल्हाद जोशी
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मणिपूर मुद्यावर संसदेत झालेल्या गदारोळावर सांगितले की, जेव्हा दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष निर्देश देतील तेव्हा आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अधिकृतपणे लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना सांगितले आहे. विरोधकांकडून नवनव्या मागण्या करून चर्चेत अडथळा आणणे चुकीचे आहे. ह्या अधिवेशनात महत्त्वाची विधेयके संसदेत आणायची असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला संसदेत सर्वसमावेशक चर्चा करायची आहे. मात्र, विरोधक केवळ चुकीचे विधान करून संसदेचे कामकाज विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते पुढे म्हणाले.
सरकारने अधिवेशनासाठी 31 विधेयके सूचीबद्ध केली आहेत, ज्यात 11 ऑगस्ट रोजी अधिवेशन संपण्यापूर्वी 17 बैठका असतील. गुऊवारी पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मोदींनी मणिपूरमधील लैंगिक छळाच्या घटनांचा निषेध करत त्या मुलींसोबत जे घडले ते कधीही माफ केले जाऊ शकत नाही, दोषींना सोडले जाणार नाही’ असे स्पष्ट केले आहे.