पूर्वसूचना न देता मुख्याधिकाऱ्यांनी काढला फलक, भाजपाचे धरणे आंदोलन
वार्ताहर /खानापूर
खानापूर शहराजवळ वसाहत निर्माण झाली आहे. या वसाहतीचे नाव वाजपेयीनगर म्हणून ठेवण्यात आले होते. रविवारी वाजपेयीनगर नामफलक भाजपाच्या नेत्यांच्या हस्ते लावला होता. कोणतीही परवानगी नसल्याचे कारण दाखवून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजू वठारे यांनी मंगळवारी सदर फलक काढून नगरपंचायत कार्यालयात आणला. ही माहिती वाजपेयीनगरात व खानापूर शहरात पसरताच कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे धरले. यामुळे काहीकाळ गोंधळ माजला. युवकांची संख्या वाढताच पोलीसही मोठ्या प्रमाणात नगरपंचायतीकडे दाखल झाले. नगराध्यक्ष नारायण मयेकर लागलीच नगरपंचायतीकडे आले. फलक काढल्याबद्दलचा जाब नगराध्यक्ष मयेकर यांना विचारण्यात आला. पण रविवारी आम्हीच लावलेला फलक आम्ही कसा काढू, असा प्रतिप्रश्न युवकांना करून वाजपेयींबद्दल आम्हाला आदर आहे. म्हणूनच आम्ही हा फलक लावला असल्याचे मयेकरनी सांगितले.
त्यानंतर मुख्याधिकारी राजू वठारे यांच्याकडे भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा वळवून याबाबत जाब विचारला. त्यावेळी मात्र ते निरूत्तर झाले. शेवटी नगरपंचायत कार्यालयासमोर झालेल्या गोंधळामुळे नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी यामध्ये हस्तक्षेप केला. त्यानंतर सन्मानाने फलक पुन्हा लावण्याचे उपस्थितांतून ठरले. यावेळी जि. पं. माजी सदस्य जोतिबा रेमाणी, भाजप नेते किरण यळळूरकर, रामचंद्र देसाई, पंडित ओगले, आनंद पाटील, किरण तुडयेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.