भाषणातील मुद्दे वगळल्याने मल्लिकार्जुन खर्गे संतप्त ः विरोधकांचा सभात्याग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शुक्रवारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभेमध्ये जोरदार गदारोळ केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या भाषणातील 6 भाग काढून टाकण्यावर प्रश्न उपस्थित केला. यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. घोषणाबाजी करत विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभा अध्यक्षांच्या वेलमध्ये घुसले. सभाध्यक्ष जगदीप धनखड यांनी सर्वांना आपापल्या जागेवर परतण्याचे आवाहन केले. सभापतींच्या आक्षेपानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. गोंधळ घालणाऱया सदस्यांमध्ये रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, तुलसी, केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक सदस्यांचा समावेश होता.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी सकाळच्या सत्रात विरोधकांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर त्यांनी सभाध्यक्षांना उद्देशून “आम्ही तुमचा आदर करतो. आमची नाराजी तुमच्यावर नाही, सरकारवर आहे, पण तुम्ही माझ्या भाषणातून 6 मुद्दे काढून टाकलेत जे असंसदीय नव्हते,’ असे स्पष्ट केले. याचदरम्यान विरोधी पक्षनेते खर्गे यांना सभागृहात बोलू न दिल्याने शुक्रवारी राज्यसभेतील काँग्रेस आणि इतर काही विरोधी खासदारांनी सभात्याग केला. आपला मुद्दा मांडू इच्छिणाऱया विरोधी पक्षनेत्याच्या समर्थनार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निदर्शने केली, मात्र अध्यक्षांनी त्यांची मागणी मान्य केली नाही. या गोंधळातच सभागृह नेते पीयूष गोयल यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान गोंधळ निर्माण करणाऱया खर्गे यांनी संपूर्ण विरोधकांच्या वतीने माफी मागितली पाहिजे, असे स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या भाषणात केवळ स्वतःचे कौतुक ः खर्गे
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्वतःची केवळ प्रशंसा केली. त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. बेरोजगारी, महागाई, अदानी, रुपयाची घसरण आदी मुद्यांवर ते बोलले नाहीत. तेच या देशाला वाचवू शकतात, हा अहंकार असल्याचे खर्गे यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत द्रमुकचा आरोग्यमंत्र्यांशी वादंग
दुसरीकडे, लोकसभेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि द्रमुकच्या खासदारांमध्ये वादावादी झाली. वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी देण्याच्या मुद्दय़ावर झालेल्या चर्चेवेळी पायाभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाला सरकारकडून परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण मांडविया यांनी दिले आहे. तसेच मदुराई येथील एम्सच्या निर्मितीवर काम सुरू असल्याचे स्पष्ट करत आरोग्याला राजकारणाचा मुद्दा बनवू नका, असा इशाराही दिला.