कामकाज मंगळवारपर्यंत स्थगित
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेश विधानसभेचे अधिवेशन सोमवारी गोंधळात सुरू झाले आहे. कामकाज सुरू होताच समाजवादी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. एक तास 10 मिनिटांपर्यंत राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे अभिभाषण चालले. यादरम्यान सप आमदार ‘राज्यपाल वापस जाओ’ अशा घोषणा देत राहिले. तसेच सरकारविरोधी, महागाई आणि बेरोजगारीसंबंधीचे फलक त्यांनी झळकविले आहेत. सभापतींसमोरील मोकळय़ा जागेत पोहोचून सप आमदारांनी गोंधळ घातल्याने कामकाज मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. 6 दिवस चालणाऱया या अधिवेशनात योगी आदित्यनाथ यांचे सरकार 26 मे रोजी अर्थसंकल्प मांडणार आहे.