48 लाख रुपयांसह पकडले गेले होते आमदार ः पश्चिम बंगाल पोलिसांकडून होतेय चौकशी
वृत्तसंस्था / रांची
पश्चिम बंगालच्या हावडा जिल्हय़ात 3 आमदारांकडे 48 लाख रुपये रोख स्वरुपात मिळाल्याने झारखंड काँग्रेसला धक्का बसला आहे. एका काळय़ा रंगाच्या कारमधून मिळालेल्या रोख रकमेनंतर पोलिसांनी तिन्ही आमदारांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. या आमदारांसोबत एक चालक तसेच एका सहाय्यकाला अटक करण्यात आली आहे. तर झारखंड काँग्रेसचे विधिमंडळातील नेते आलमगीर आलम यांनी काँग्रेसच्या तिन्ही आमदारांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. प्रत्येक आमदाराला 10 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती असा दावा करण्यात येत आहे.
केवळ 40-50 लाख रुपयांद्वारे राज्यातील सरकार पाडविले जाऊ शकत नसल्याचे एका आमदाराच्या निकटवर्तीयाने म्हटले आहे. झारखंडमध्ये भाजप मुख्य विरोधी पक्ष आहे. निवडणुकीनंतर झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. झामुमोने काँग्रेसच्या समर्थनाद्वारे सरकार स्थापन केले होते.
कारमध्ये राजेश कच्छप, नमन विक्सेल कोंगारी आणि इरफान अंसारी हे आढळून आले. रानीहाटीमध्ये महामार्गावरून जात असलेल्या कारमध्ये मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम असल्याची माहिती खबऱयांकडून मिळाली होती. नाकाबंदी करून आम्ही कार रोखली असता ही माहिती खरी असल्याचे आढळून आले असा दावा हावडा शहरातील पोलीस उपायुक्त प्रतीक्षा झाखरिया यांनी केला आहे.
रकमेचे आसाम कनेक्शन
रोख रक्कमेचा स्रोत पोलिसांनी अद्याप उघड केलेला नाही. परंतु या रकमेचे कनेक्शन ईशान्येतील राज्य आसाम असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंड काँग्रेसच्या एका माजी अध्यक्षाने आसाममधील मातब्बर भाजप नेत्याची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमधील भेट दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात बंद खोलीत झाली होती. त्या भेटीदरम्यान काँग्रेस नेत्याचा पुत्रही उपस्थित होता. या बैठकीनंतर या काँग्रेस नेत्यासोबत पक्षाचे 5 आमदार सामील झाले. यातील 3 आमदार शनिवारी रात्री उशिरा पश्चिम बंगालमध्ये पोलिसांच्या जाळय़ात सापडले आहेत.
कारमधून मिळाली रोख रक्कम
इरफान अंसारी हे झारखंडच्या जामताडाचे आमदार आहेत. तर नमन विक्सल कोंगाडी सिमडेगाच्या कोलेबिराचे तर राजेश कच्छप हे रांची जिल्हय़ातील खिजरी मतदारसंघाचे आमदार आहेत. तर संबंधित कार ही बोकारोतील नईम अंसारीच्या नावाने नोंदणीकृत आहे. परंतु त्या कारच्या समोरील बाजूस आमदार, जामताडा असे बोर्ड आहे. ही कार गुवाहाटीमधून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली होती असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पोलिसांना मिळाला होता इनपूट
कारमध्ये रोख रक्कम असल्याचा इनपूट पश्चिम बंगाल पोलिसांना मिळाला होता. हा इनपूट झारखंड आणि दिल्लीतून मिळाला होता. आमदार अंसारी यांनी हा पैसा देणगीतून जमा झाल्याचे सांगितले.
सरकार अस्थिर करण्याचा कट
झारखंडमधील सरकार अस्थिर करण्याचा हा कट आहे. आगामी काळात याबद्दल चित्र अधिक स्पष्ट होईल. महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडमध्येही आघाडी सरकार कोसळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी केला आहे. विधिमंडळातील पक्षनेते आलमगीर आलम यांनी हे अत्यंत गंभीर प्रकरण असून यासंबंधी पूर्ण माहिती पक्षशेष्ठींना दिली जाणार असल्याचे म्हटले आहे.
आसाम मुख्यमंत्र्यांवर आरोप
झारखंडमधील सरकार पाडण्यासाठी राबविण्यात आलेले ऑपरेशन लोटस अपयशी ठरले आहे. या पूर्ण घटनाक्रमासाठी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा हे जबाबदार ओत. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या कुठल्या आमदाराशी संपर्क झाला हे उघड करणारे फोन रेकॉर्डिंग आमच्याकडे असल्याचे झारखंड काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी म्हटले आहे.