नवी दिल्ली
अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलन होत असताना काँग्रेस पक्षानेही निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. रविवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर काँग्रेस नेते आंदोलन करणार असून, त्यात पक्षाचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, रुग्णालयातून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आंदोलक तरुणांना उद्देशून निवेदन जारी केले आहे. सोनिया यांनी पत्रात तरुणांना अहिंसक पद्धतीने लढा देण्याचे आवाहन केले आहे. ही योजना पूर्णपणे दिशाहीन असून तरुणांची फसवणूक सुरू आहे. या योजनेवर संरक्षण तज्ञ आणि माजी सैनिकांनीदेखील प्रश्न केले आहेत, असे सोनिया गांधी म्हणाल्या. तसेच राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. सलग 8 वर्षे भाजप सरकारने जय जवान, जय किसानच्या मूल्यांचा अपमान केला आहे. आता कृषी कायद्यांप्रमाणे अग्निपथ योजनाही सरकारला मागे घ्यावी लागेल, असे ते पुढे म्हणाले.