विरोधी ऐक्याचेही संकेत : नितीशकुमार-मल्लिकार्जुन खर्गे-राहुल गांधी भेटीनंतर स्पष्टोक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली-पोस्टिंगबाबत केंद्राच्या अध्यादेशाच्या मुद्यावर काँग्रेस पक्ष आम आदमी पार्टीला पाठिंबा देणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यादव यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर सूत्रांनी यासंबंधी माहिती दिली. केंद्राने काढलेल्या अध्यादेशाविरोधात काँग्रेस पक्ष ‘आप’ला पाठिंबा देईल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी प्रयत्नांना वेग दिला आहे. नितीशकुमार सोमवार, 22 मे रोजी दिल्लीतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी पोहोचले. या महत्त्वाच्या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह आणि बिहार सरकारचे मंत्री संजय झा उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तेजस्वी यादव बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. बैठकीनंतर के. सी. वेणुगोपाल आणि लालन सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज आमच्या बैठकीत विरोधी ऐक्मयाबाबत एकमत करण्यावर सविस्तर चर्चा झाली. विरोधी ऐक्मयासाठी सर्व पक्षांची बैठक होणार असून, त्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत ठिकाण, वेळ आणि तारीख निश्चित होईल. बहुतांश विरोधी नेत्यांना या संयुक्त बैठकीसाठी निमंत्रित केले जाणार असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले.
लोकशाहीची ताकद हाच आमचा संदेश
नितीशकुमार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर ‘आता देश एकजूट होईल, लोकशाहीची ताकद हाच आमचा संदेश आहे’, असे ट्विट मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. राहुल गांधी यांच्यासह आपण आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. देशाला नवी दिशा देण्याची प्रक्रिया पुढे नेण्यासंबंधी सकारात्मक बोलणी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी शनिवारी कर्नाटकातील नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात 18 विरोधी पक्षांचे नेते एकाच मंचावर दिसले होते. या माध्यमातून विरोधकांच्या ऐक्मयाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती.
विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि नितीशकुमार गेल्या काही महिन्यांपासून विरोधी एकजुटीसाठी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांतर्गत खर्गे यांनी अनेक विरोधी नेत्यांशी चर्चा आणि भेट घेतली आहे. दुसरीकडे नितीशकुमार यांनीही भेटीगाठी वाढवून बहुतांश विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर येण्याचा सल्ला दिला आहे. नजिकच्या काळात बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊ शकते.