विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरुन रंगणार नाट्य; इच्छुकांची संख्या वाढली, सोशल मीडिया, डिजिटल फलकावरुन प्रमोशन
धीरज बरगे कोल्हापूर
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि भाजप कब्जा करणार, असे चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहे. भाजप व राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांकडून अप्रत्यक्षरित्या या जागेवर दावा सांगितला जात आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये विभागलेल्या शिवसेनेला पक्षातील बंडाळीमुळे हक्काच्या मतदारसंघावर पाणी फेरावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप, काँग्रेसचा कोल्हापूर ‘उत्तर’वर दावा असला तरी ठाकरे व शिंदे गटानेही येथे दावा सांगितला आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपावेळी महायुती, महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत नाट्या रंगणार आहे. कोल्हापूर उत्तरमधून इच्छुकांची संख्या वाढली असून त्यांचे सोशल मीडिया, डिजिटल फलकाच्या माध्यमातून प्रमोशन सुरु आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आत्तापर्यंत पाच वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. दोनवेळा काँग्रेसचा आमदार झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी आणि त्यानंतर शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे उत्तरमधील राजकीय समीकरणेच बदलली आहेत. या बदललेल्या राजकीय समिकरणांचा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तरचे तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांचा राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी पराभव केला. या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवरुन भाजप-शिवसेनेत मतभेद झाल्याने शिवसेना राष्ठ्रीय काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली. या तीन बड्या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आणले. परिणामी राज्यात भाजप एकाकी पडली. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. त्यामुळे येथे पोटनिवडणूक लागली. या पोट निवडणुकीत शिवसेनेत असणारे क्षीरसागर व पवार गट एकत्र आले. त्यांनी क्षीरसागर यांना उमेदवारी देऊन पोटनिवडणूक लढण्याची मागणी वरीष्ठांकडे केली. मात्र पक्षप्रमख उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर बालेकिल्ल्यात पोटनिवडणूक लढण्यापासून शिवसेना थांबली. परिणामी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्या प्रचारात राजेश क्षीरसागर सक्रीय झाले. तर युतीमधून शिवसेना बाहेर पडल्याने कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपला निवडणूक लढवावी लागली. भाजपकडून लढताना सत्यजित कदम यांनी लक्षवेधी मते मिळवली. कदम यांचा थोडक्यात पराभव झाला असला तरी उत्तरमधून आपण विजय मिळवू शकतो, असा विश्वास भाजपमध्ये निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर बदललेली राजकीय समीकरणे शिवसेनेतील बंडानंतर आणखी बदलली आहेत. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. शिंदे गटासोबत पुन्हा महायुतीमध्ये गेलेले माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर उत्तरमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. ठाकरे गटासोबत महाविकास आघाडीमध्ये असलेले संजय पवार यांनीही मध्यंतरी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत उत्तर मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला पाहिजे, अशी मागणी केली. दोन्ही शिवसेनेने कोल्हापूर उत्तरवर दावा केल्यानंतर भाजपचे नेते खासदार धनंजय महाडिक यांनी उत्तरचा पुढील आमदार भाजपचा असेल, असे वक्तव्य करत या जागेवर अप्रत्यक्षरित्या भाजपचा दावा सांगितला आहे. राष्ट्रीय काँग्रेसने या जागेबाबत कोणतेही वक्तव्य केले नसले तरी येथून काँग्रेसचा विद्यमान आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधून या जागेवर काँग्रेसचाच दावा राहणार आहे.
इच्छुकांची संख्या वाढली, प्रमोशन सुरु
उत्तरमधून सध्या दोन्ही शिवसेनेसह काँग्रेस, भाजपमधून इच्छुकांची संख्या वाढली आहे. शिंदे गटाकडून एकमेव राजेश क्षीरसागर यांचे नाव असणार आहे. ठाकरे गटाकडून उपनेते संजय पवार देखील इच्छुक आहेत तर शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांचे शहरात भावी आमदार म्हणून डिजिटल फलक झळकले आहेत. भाजपकडून उत्तरमधून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या नावाची पेरणी सुरु असली तरी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सत्यजित कदम, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहूल चिकोडे देखील इच्छूक आहेत. काँग्रेसमधून छत्रपती परिवारातील मधुरिमाराजे छत्रपतींचे नाव चर्चेत असून सोशल मीडियावर भावी आमदार म्हणून त्यांचे रिल्स व्हायरल होत आहेत. तर ऐनवेळी काँग्रेसचा बडा नेताच उत्तरच्या रणांगणात उतरणार असल्याचीही चर्चा आहे.