वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा 78 वा जन्मदिवस काँग्रेसकडून साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. राजीव गांधींनी देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा दिली. तसेच त्यांनी देशासाठी प्राणार्पण केले, अशी भलावण अनेक काँग्रेस नेत्यांनी याप्रसंगी केली. राजधानी दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी राजीव गांधींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजीव गांधी यांची त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा करत त्यांना अभिवादन केले. 1984 ते 1989 या पाच वर्षांच्या काळात राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते. 1984 मध्ये त्यांच्या माता आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राजीव गांधी यांनी समर्थपणे देशाचा कारभार चालविला होता. 1991 मध्ये लोकसभेची निवडणूक सुरू असताना राजीव गांधी यांचीही तामिळनाडूतील श्रीपेराम्बुदूर येथे एलटीटीईच्या आत्मघाती पथकाकडून हत्या करण्यात आली होती. भारतात संगणकाचे युग व्यापक प्रमाणात अवतरण्यास राजीव गांधी यांची धोरणे कारणीभूत आहेत, असे मानले जाते. अर्थव्यवस्था आधुनिक करण्यातही त्यांचे योगदान होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच देशाला समृद्धी प्राप्त झाली, असे प्रतिपादन काँग्रेसने केले आहे.