विधानसभा निवडणुकीतील पराभवावर होणार मंथन : लोकसभा निवडणुकीच्या रणनीतिवर चर्चा शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक 21 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. काँग्रेसने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतिवर चर्चा करणे आणि भाजपचे आव्हान पेलण्यासाठी स्वत:च्या प्रचारमोहिमेला मूर्त स्वरुप देण्याकरता ही बैठक बोलाविली आहे. या बैठकीत अलिकडेच पार पडलेल्या 5 राज्यांपैकी 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर मंथन होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या बैठकीत पक्षाध्यक्ष खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वड्रा सहभागी होणार आहेत. काँग्रेस कार्यकारिणी समिती ही पक्षासंबंधी निर्णय घेणारी सर्वोच्च व्यवस्था आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सद्यकालीन राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलाविली आहे. सूत्रांनुसार अखिल भारतीय काँग्रेस मितीच्या मुख्यालयात होणारी ही बैठक ‘इंडिया’च्या बैठकीच्या दोन दिवसांनी होणार आहे. इंडिया आघाडीची बैठक 19 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
राहुल यांच्या यात्रेसंबंधी चर्चा शक्य
कार्यकारिणीच्या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांच्याकडून बेरोजगारी आणि महागाईला मुख्य मुद्दा ठरवून काढल्या जाणाऱ्या यात्रेवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्ष या यात्रेच्या मोडसंबंधी विचार करत आहे, ही पदयात्रा असावी का हायब्रिड मोडमध्ये असावी याबाबत पक्ष निर्णय घेऊ पाहत आहे. पक्ष पदयात्रेसोबत हायब्रिड मोडमध्ये पूर्व ते पश्चिम अशी भारत जोडो यात्रा काढण्याचा विचार करत असून लवकरच यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
अजेंड्यावर चर्चा
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीशी निगडित पक्षांच्या नेत्यांची चौथी बैठक 19 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजना नवी दिल्लीत पार पडणार आहे. इंडिया आघाडीसमोर ‘मुख्य सकारात्मक अजेंडा’ तयार करणे, जागावाटप आणि संयुक्त प्रचारसभा आयोजित करण्याचा कार्यक्रम मुख्य आव्हानांमध्ये सामील आहे. यासंबंधी आगामी बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर म्हणून एकतेची थीम ‘मैं नहीं, हम’च्या नाऱ्यासोबत वाटचाल करण्याचा विचार पुढे येऊ शकतो असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.
5 राज्यांच्या निकालाची पार्श्वभूमी
काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत अलिकडेच पार पडलेल्या 5 राज्यांमधील निवडणुकीच्या निकालाचे देखील विश्लेषण केले जाणार आहे. यात मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. तर तेलंगणात काँग्रेस पक्ष विजयी ठरला होता. मिझोरममध्ये देखील पक्षाची हार झाली होती. या निकालासंबंधी मंथन करत पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीति काँग्रेस ठरविणार आहे.