चिंतनशिबिरात सोनिया गांधींचा संदेश, एक कुटुंब एक तिकिटाचा निर्णय पण गांधी कुटुंबाचा अपवाद
उदयपूर / वृत्तसंस्था
‘काँगेसने आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आजवर सर्वकाही दिले आहे. आता रुण फेडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी तन मन धनाने पक्षासाठी झोकून देऊन कार्य करावे, असे आवाहन काँगेसच्या चिंतन शिबिरात पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. शुक्रवारी शिबिराची सुरुवात झाली. ते तीन दिवस चालणार आहे. आज शिबिरात काही निर्णय घेण्यात आले.
यापुढे कोणत्याही निवडणुकीत तिकिट वाटप करताना एक कुटुंब, एक तिकिट हा नियम लागू होणार आहे. मात्र, याला नेहरु-गांधी कुटुंबाचा अपवाद ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पक्षसंघटना तळागाळात बळकट करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्णयही घेण्यात आला. पक्षात संघटनात्मक सुधारणा करण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट करत सोनिया गांधी यांनी पक्षाची सर्वंकष पुनर्बांधणी करण्याचे संकेतही दिले. काँगेसचे बहुतेक नेते शिबिरासाठी उपस्थित आहेत.
भाजपवर टीका
केंद्रात आणि काही राज्यांमध्ये सत्ताधारी असणारा भाजप देशविरोधी धोरणे राबवित आहे. धर्माच्या नावावर सातत्याने समाजात दुफळी माजवून राजकीय ध्रुवीकरण करण्याचे धोरण आहे. देशात अल्पसंख्याकांवर अत्याचार केले जात आहेत. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघपरिवारातील संघटना यांनी देश आपल्या मुठीत ठेवला असून शांतताप्रिय बहुसंख्याकांनाही त्यांच्यामुळे जीव मुठीत धरुन रहावे लागत आहे, अशा प्रकारची टीका सोनिया गांधींनी केली. भाजपमुळेच महागाई आणि बेरोजगारी वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.
परिवर्तन अनिवार्य
नव्या काळानुसार काँगेसमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. आपले विरोधक वेगाने या सुधारणा आणि नवी तंत्रे स्वीकारत आहेत. काँगेसलाही याच अनुकरण करावे लागणार असून आम्ही ते करण्याचा निर्धार केला आहे. या शिबीरानंतर काँगेस एक बदललेला पक्ष म्हणून जनतेसमोर येईल, असा विश्वास पक्षाचे महासचिव अजय माकन यांनी भाषण करताना व्यक्त केला.
मूल्यांकन समिती स्थापणार
काँगेस नेत्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी एक ज्येष्ठ नेत्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. कोणालाही कामागिरीच्या आधारावर पदोन्नती देण्याचा किंवा पदावरुन काढून टाकण्याचा अधिकार या समितीला असेल. ही मागणी काँगेसच्या 23 बंडखोर नेत्यांनी दीड वर्षांपूर्वी केली होती. निवडणुकांमध्ये पराभव झाल्यास जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
जनसंपर्क कक्ष स्थापणार
पक्षाच्या धोरणासंबंधी आणि परिस्थितीविषयी जनतेच्या भावना काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी जनसंपर्क कक्ष स्थापण्यात येणार आहे. या कक्षात काम करणारे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांशी चर्चा करुन त्यांना महत्वाचे वाटणारे मुद्दे जाणून घेणार आहेत. ही सर्वेक्षणे प्रतिदिन केली जाणार आहेत.
युवकांना प्राधान्य देणार
यापुढे काँगेस पक्षाच्या सर्व समित्यांमध्ये किमान 50 टक्के सदस्य 50 वर्षांहून कमी वयाचे असतील. प्रत्येक 20 मतदानकेंद्रांसाठी एक मंडल समिती असेल. प्रत्येक ब्लॉकमध्ये अशा पाच ते दहा मंडल समित्या असतील. तसेच ज्यांनी सलग पाच वर्षे पक्षासाठी कार्य केले आहे, त्यांना तिकिटे प्राधान्याने दिली जातील. मात्र, पक्षाच्या अध्यक्षपदासंबंधी कोणतीही समिती चर्चा करणार नाही. पक्षाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरु असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
चिंतन शिबीर कशासाठी
गेल्या काही वर्षांमध्ये काँगेसला सातत्याने निवडणुकांमध्ये पराभवाला तोंड द्यावे लागत आहे. उत्तर प्रदेशसारख्या महत्वाच्या राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला अवघी 2.3 टक्के मते आणि 2 जागा मिळाल्या. पंजाबमधील सत्ता गमवावी लागली. ज्या राज्यांमध्ये विजय अपेक्षित होता तेथेही पराजयाचे तोंड पाहण्याची वेळ आली. दोन लोकसभा निवडणुकांमध्ये नामुष्कीची हार पत्करावी लागली. अनेक विधानसभा निवडणुकांमध्येही हीच गत झाली. या पार्श्वभूमीवर आत्मपरिक्षण करण्यासाठी हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पक्षात संघटनात्मक सुधारणा कशा करता येतील आणि त्या कशा क्रियान्वित होतील यावर विचार या शिबीरात केला जात आहे. पक्षात जुने विरुद्ध नवे असा संघर्ष उफाळून आला असून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न यात करण्यात येणार आहे. म्हणून हे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले गेले आहे.
आपल्याला जिंकायचेच आहे
काँगेस पक्ष भारताच्या तळागाळात पोहचलेला पक्ष असून भाजपचे आव्हान स्वीकारण्याची क्षमता याच पक्षात आहे. भाजपचे आव्हान परतविण्यासाठी आपल्याला जिंकावेच लागणार आहे. कार्यकर्त्यांनी निर्धाराने आपल्यातील मतभेद मिटवून हे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज रहावे. कोणत्याही अंतर्गत वादाला थारा देऊ नये, असे आवाहन गांधींनी केले. उदयपूरचे हे शिबीर हा पक्षासाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक कुटुंब, एक तिकिट…केवळ धूळफेक ? काँगेससमोर चर्चेसाठी असलेल्या प्रस्तावांमध्ये एक कुटुंब एक तिकीट हा महत्वाचा प्रस्ताव होता. त्यावर निर्णयही झाला. पण ज्या ज्येष्ठ काँगेस नेत्यांची मुले, कन्या आणि इतर नातेवाईक यांनी पक्षासाठी पाच वर्षे काम केलेले आहे, अशा नेत्यांना या नियमातून सूट दिली जाणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. परिणामी हा नियम केवळ एक धूळफेक ठरणार का, असा प्रश्न तज्ञांनी विचारला आहे. कारण प्रियांका गांधी, दिग्वीजय सिंग यांचे पुत्र जयवर्धन, मल्लीकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक, ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल, हरिष रावत यांचे पुत्र आनंद, पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती, मीरा कुमार यांचे पुत्र अन्शुल, प्रमोद तिवारी यांची कन्या आराधना, पी. एल. पुनिया यांचे पुत्र तनुज, भूपिंदर हुडा यांचे पुत्र दीपेंदर, कमल नाथ यांचे पुत्र नकुल सुशिल कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती आदी असंख्य राष्ट्रीय नेत्यांची मुले ‘पाच वर्षे काम’ या नियमाचा आधार घेऊन तिकिटासाठी पात्र होऊ शकतात. राज्यस्तरीय नेत्यांची संख्या तर अतिशय मोठी आहे. त्यांची मुले किंवा नातेवाईकही याच नियमाच्या आधारावर तिकीटासाठी पात्र होऊ शकतात. त्यामुळे हा नियम नेमका कुणासाठी, हा प्रश्न निर्माण झाला