पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल : राहुल गांधींकडून भाजपला प्रत्युत्तर
राजस्थानात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस याच दोन पक्षांदरम्यान होणार आहे. भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तर काँग्रेसकडून राहुल गांधी हे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी अंता येथे जाहीर सभेला संबोधित करत घराणेशाही, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले. तर राहुल यांनी वल्लभनगर येथील सभेत भाजपवर हिंसा आणि द्वेष फैलावण्याचा आरोप केला आहे.
काँग्रेस भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाचे प्रतीक आहे. राजस्थानात सध्या लाल डायरीची सर्वाधिक चर्चा आहे. या लाल डायरीची पानं उलटण्यासोबत जादूगाराच्या (अशोक गेहलोत) चेहऱ्यावरील रंग उडून जात आहे. या लाल डायरीत काँग्रेस सरकारने 5 वर्षांमध्ये राज्यातील जल, जंगल आणि जमीन कशी विकली याचा लेखाजोखा असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
काँग्रेसमध्ये मंत्री, आमदार निरंकुश
राजस्थानात अवैध खाणकामात कोण गुंतले होते हे लपून राहिलेले नाही. काँग्रेसच्या एका मंत्र्याने स्वत:च्या स्वार्थापोटी पूर्ण गावच गिळकृंत केल्याचा आरोप काँग्रेसच्याच आमदाराने केला आहे. काँग्रेसमध्ये मंत्री असो किंवा आमदार सर्व निरंकुश झाले असून जनता त्रस्त झाली आहे. काँग्रेसने राजस्थानच्या जनतेला लुटारू, अत्याचारी आणि गुन्हेगारांच्या हवाली केले असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. काँग्रेसच्या समर्थनामुळेच समाजकंटक मोकाट फिरत आहेत. झालावाडमध्ये दलित युवकांसोबत काय घडले हे पूर्ण देशाने पाहिले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात छबडा आणि गंगधार येथे काय घडले हे कुणीच विसरू शकत नाही. दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याऐवजी छबडा दंगलीच्या आरोपीचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रेडकार्पेटवर स्वागत करण्यात आले. दंगलखोरांसोबत काँग्रेसचे मंत्री मुलींवर अत्याचार करणाऱ्यांनाही पाठिशी घालत असल्याची टीका मोदींनी केली.
कानाकोपऱ्यातून काँग्रेसचे उच्चाटन
काँग्रेस सरकार लोकांचे जीव आणि प्रतिष्ठेची सुरक्षा करू शकत नाही. दीपावलीनिमित्त आमच्या माताभगिनी घरातील कानाकोपऱ्याची सफाई करतात, तशाच प्रकारे आम्हा सर्वांना मिळून राजस्थानातून काँग्रेसची सफाई करावी लागेल. कुठल्याही कानाकोपऱ्यात काँग्रेस शिल्लक राहू नये. काँग्रेसचे लुटारू सरकार जनतेचा विश्वासघात कसा करते हे 5 वर्षांमध्ये दिसून आले आहे. काँग्रेसने येथे वीजेचे बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आता राजस्थानचे सरकार लोकांना वीज बिल थकबाकीच्या नोटीस पाठवत आहे. काँग्रेसच्या धोरणांमुळे राजस्थानात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. काँग्रेसने कर वाढवून राज्यात इंधन प्रचंड महाग केल्याचा दावा मोदींनी केला आहे.
द्वेष, भय फैलावण्याचे कृत्य
भाजप देशात हिंसा, भय आणि द्वेष फैलावत आहे. द्वेष फैलावण्याचे कारण बेरोजगारी आणि महागाई आहे. भाजपची यंत्रणा या दोन्ही मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी द्वेष फैलावते. हिंदुस्थानचे धन गरीब, मजूर, शेतकरी, दलित आणि आदिवासींना मिळू नये म्हणून भाजप प्रयत्नशील आहे. हिंदुस्थानचे धन अब्जाधीशांच्या हाती रहावे अशी भाजपची इच्छा असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.