काँगेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर अशा पदयात्रेला 7 सप्टेंबरला प्रारंभ झाला आहे. ही पदयात्रा 150 दिवस ‘चालणार’ असून या कालावधीत राहुल गांधी 3,500 किलोमीटरचे अंतर कापणार आहेत, असे घोषित करण्यात आले आहे. भारतातील राजकीय नेत्यांना अशा दीर्घ पल्ल्याच्या पदयात्रा किंवा वाहन यात्रा नवीन नाहीत. 1981 मध्ये तत्कालीन जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनीही अशाच प्रकारची कन्याकुमारी ते दिल्ली पदयात्रा काढली होती. अशा पदयात्रांमागचा नेत्यांचा उद्देश ‘आम्ही तुमच्यातलेच आहोत’ हे जनतेला दाखविणे हा असतो. जनतेमध्ये मिसळून तिची दुःखे आणि समस्या समजून घेण्यासाठी त्या काढल्या जातात असा नेत्यांचा दावा असतो. राहुल गांधी यांची ही पदयात्राही याच उद्देशाने काढली असावी. पण त्यांनी या पदयात्रेचे सांगितलेले एक कारण मात्र, स्वारस्यपूर्ण आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भारतातील सारा मिडीया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यापला आहे. टीव्हीवर केवळ पंतप्रधान मोदीच दिसतात. त्यामुळे ही पदयात्रा काढावी लागली. राहुल गांधी यांच्या अनेक विधानांचा अर्थ कित्येकदा काढता येणे कठीण असते. तो समजावून सांगण्यासाठी काँगेस प्रवक्त्यांच्या बुद्धीचा कस लागतो. तशाच पैकी हे एक विधान आहे. जर ही पदयात्रा टीव्हीवर पंतप्रधान मोदींचेच दर्शन केवळ घडते म्हणून काढली असेल तर ती केवळ प्रसिद्धीसाठी आणि टीव्हीवर झळकण्यासाठी काढली आहे काय, अशी शंका असंख्यांच्या मनात डोकावून गेल्याखेरीज राहणार नाही. या पदयात्रेमुळे पंतप्रधान मोदी टीव्हीवर कमी दिसू लागतील आणि आपले दर्शन अधिक प्रमाणात होऊ लागेल, असे राहुल गांधींना वाटते का, असाही प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. अर्थात, हे प्रश्न कुत्सितपणातून उमटलेले नाहीत. तर राहुल गांधींच्या स्वतःच्या विधानातूनच निर्माण झालेले आहेत. तेव्हा या विधानाचा योग्य आणि समर्पक अर्थ लावून तो सांगण्याची जबाबदारी काँगेस प्रवक्त्यांची आहे. ती ते पार पाडतीलच. ही पदयात्रा राजकीय आहे हे उघड आहे. कारण यापूर्वीही राजकीय नेत्यांनी स्वतःच्या आणि स्वतःला आणि स्वतःच्या पक्षाला राजकीय उर्जितावस्थेत आणण्यासाठी. मरगळ झटकण्यासाठी, तसेच सर्वांच्या चर्चेत आणि प्रकाशात आणण्यासाठी अशा यात्रा काढल्या आहेत. तेव्हा ही पदयात्रा त्याच कारणासाठी असेल असे सर्वसाधारणतः म्हणता येते. यात काहीही अनैसर्गिक नाही. कारण सध्या काँगेसकडे देशाच्या राजकारणाचे मध्यवर्ती स्थान राहिलेले नाही. काही दशकांपूर्वी काँग्रेस मध्यभागी, आणि अवती भोवती लहान मोठय़ा प्रमाणात काँगेसचे मित्रपक्ष किंवा विरोधी पक्ष फिरताहेत, असे राजकीय चित्र होते. ते कधीतरी बदलेल आणि काँगेस राजकीय क्षेत्राच्या कोपऱयात फेकली जाईल, असे तेव्हा कोणी म्हटले असते तर त्याची गणना वेडय़ांमध्ये झाली असती. त्या काळात काँगेसचा पराभव होत नव्हता असे मुळीच नाही. 1977, 1989, 1998 आणि 1999 असा चार लोकसभा निवडणुकांमध्ये काँगेसचा राष्ट्रीय पातळीवर पराभव झाला आहे आणि काँग्रेसेतर सरकारे स्थापन झाली आहेत. त्यांपैकी पहिली तीन अल्पजीवी ठरली होती. तर 1999 चे अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पूर्ण कालावधीचे ठरले होते. पण या चार निवडणुकांनंतरही काँगेसचा प्रभाव टिकून होता आणि पुन्हा उसळी घेऊन सत्तेत आलाही होता. तथापि, 2013 मध्ये राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान मोदींचे नेतृत्व झकळण्यास प्रारंभ झाला आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. तेव्हापासून काँगेसला जी उतरती कळा लागली आहे, ती आज 8 वर्षांनंतरही कायम आहे. गेल्या मार्चमध्ये भारतात सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँगेसने मतांचा आतापर्यंतच्या निवडणुकांमधील नीचांक गाठून अवधी 2.3 टक्के मते मिळवली. हा उतरता आलेख काँगेसश्रेष्ठींच्या दृष्टीत असणारच. त्यामुळे पक्षाला नवसंजीवनी देण्याचा एक शेवटचा आणि कष्टाचा उपाय म्हणून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, निष्कर्ष काही राजकीय तज्ञांनीही काढला आहे. अशा पदयात्रा काढल्यानंतर पक्ष पुन्हा झगमगून उठतो, असे काही उदाहरणे दाखवून सांगितले जात आहे. आंध्र प्रदेशचे काँगेस नेते वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी 450 किलोमीटरची पदयात्रा काढून गेलेली सत्ता परत मिळविली होती. अशी काही उदाहरणे दिली जातात. काँगेसच्या संदर्भात असे या पदयात्रेमुळे होईल का, या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देणार आहे. कारण आधीच्या ज्या पदयात्रा होत्या, त्या इ. स. 2000 पूर्वी काढण्यात आल्या होत्या. गेल्या 20-22 वर्षांमध्ये मतदारांची मानसिकता बरीच बदलली आहे. पदयात्रांसारख्या सांकेतिक (सिंबॉलिक) उपक्रमांवर आजच्या वेगवान मोबाईल युगातील मतदार कितपत श्रद्धा ठेवतो, याचेही उत्तर या यात्रेनंतरच मिळणार आहे. या यात्रेला ‘भारत जोडो’ असे नाव देण्यात आले आहे. भारताच सध्या समाजासमाजांमध्ये फूट पाडणाऱया शक्तींचे प्राबल्य आहे, असा काँगेसचा दावा आहे. तेव्हा तो कथित दोष दूर करण्यासाठी, तसेच राहुल गांधींवर होणारा ‘खुशालचेंडू’पणाचा आरोप खोडून काढण्यासाठी ही पदयात्रा उपयुक्त ठरेल, असेही काँगेस नेतृत्वाला वाटत असल्यास ते साहजिकच मानले पाहिजे. पदयात्रेचा प्रारंभ होऊन अद्याप तीनच दिवस झाले आहेत. त्यामुळे तिचे फलित काय असेल यावर कोणत्याही एका बाजूने भाष्य करणे अनाठायी ठरेल. पदयात्रेचे आणि त्यापाठोपाठ काँगेसचे भवितव्य आजमावण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. तोपर्यंत या पदयात्रेचा आढावा वेळोवेळी घेतला जाईलच. नजीकच्या भविष्यकाळात गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि पुढील मे महिन्यात कर्नाटक येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. या यात्रेने काँगेससंबंधीच्या लोकांच्या आशा किती प्रमाणात पालविल्या, याचे प्रत्यंतर या निवडणुकांच्या परिणामांमधून समोर येणारच आहे. तेव्हा त्याची प्रतीक्षा केली पाहिजे. पण तोपर्यंत राहुल गांधींना शुभेच्छा.
Previous Articleदीड तासात फळली हजार दिवसांची प्रतीक्षा!
Next Article सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक सलोखा दृढ होतो
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.