वृत्तसंस्था /रायपूर
हरियाणातून राज्यसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा विजय निश्चित करण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. बंडखोरी होण्याच्या भीतीने 31 पैकी 18 आमदार छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे हलविण्यात आलेआहेत. हे आमदार चार्टर्ड विमानाने रायपूरमध्ये पोहोचले आहेत. हे सर्व आमदार आता 10 जून रोजी मतदानाच्या दिवशी परतणार आहेत. आमदारांना रायपूर येथे पाठविण्यापूर्वी पक्षाचे महासचिव के.से. वेणुगोपाल यांनी विरोधी पक्षनेते भूपेंद्र हुड्डा यांच्या निवासस्थानी आमदारांसोबत बैठक घेतली आहे.
तत्पूर्वी सर्व 31 आमदारांना गुरुवारी काही कपडय़ांसह दिल्लीत बोलाविण्यात आले होते. यातील तीन आमदार कुलदीप बिश्नोई, किरण चौधरी आणि चिरंजीव राव हे तेथे पोहोचले नव्हते. उर्वरित आमदारांना खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्या निवासस्थानावरून छत्तीसगडसाठी रवाना करण्यात आले.
सर्व आमदार एकजूट असल्याचा दावा हरियाणा काँग्रेस प्रभारी विवेक बन्सल यांनी केला आहे. कुठलाही आमदार नाराज नाही. आता भाजपने स्वतःचे हरियाणातील आमदार सुरक्षित ठेवावेत असे सांगू इच्छितो असे उद्गार दीपेंद्र हुड्डा यांनी काढले आहेत.
राज्यात काँग्रेसचे 31 आमदार असून राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी माकन यांना 30 मतांची गरज आहे. नाराज आमदार कुलदीप बिश्नोई यांच्या अनुपस्थितीत 30 आमदार एकजूट राहिले तरीही माकन विजयी होऊ शकतील. परंतु अपक्ष आमदार कार्तिकेय शर्मा आणि त्यांचे वडिल माजी मंत्री विनोद शर्मा काही काँग्रेस आमदारांना पक्षातून फोडू पाहत असल्याची चर्चा आहे. माजी सभापती कुलदीप शर्मा हे राज्यसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराचे सासरे आहेत, याचमुळे काँग्रेस अधिकच खबरदारी घेत आहे. विनोद शर्मा यांचे काँग्रेस आमदारांसोबत अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याने पक्षश्रेष्ठी कुठलीही चूक होऊ दो टाळत आहेत.