ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी अल्पमतात आली आहे. शिंदे यांनी आपल्याबरोबर ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील राज्य सरकार विधानसभा बरखास्तीच्या दिशेने प्रवास सुरू असल्याचे ट्विट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. यातच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशी माहिती समोर येत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर तिन्ही आपल्या आमदारांसोबत बैठका घेत आहेत. काँग्रेसची नुकतीच बैठक झाली. यांनतर माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेसचे सर्व आमदार महाविकास आघाडीसोबत असल्याचं म्हणाले आहेत.
बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी थोरात म्हणाले की, विधीमंडळ काँग्रेस अधिवेशनाची बैठक आता सुरू आहे. आम्हाला मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकिला पोहोचत आहोत. आमच्या काँग्रेस पक्षाचे ४४ आमदार आणि सदस्य हे मुंबईत रवाना होणार आहेत, तसेच आमचे सर्व आमदार हे महाविकास आघाडीसोबतच असणार आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
कोणत्याही प्रकारची अडचण राज्यात नाहीये. दुर्दैवाने काही प्रसारमाध्यमांतून बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे चुकीचं आहे. काँग्रेसचे सर्व आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत, हे मी स्पष्टपणे सांगत आहे, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.