लोकमान्य टिळक आजमितीला हयात असते तर त्यांनी अग्रलेख लिहिला असता ‘काँग्रेस नेतृत्वाचे डोके ठिकाणावर आहे का?’ काँग्रेसने राज्यसभेचे जे उमेदवार घोषित केले आहेत त्यावरून त्यांनी आपल्या जहाल लेखणीने पक्षनेतृत्वाला घायाळ केले असते. 137 वर्षाच्या भारताच्या सर्वात जुन्या पक्षाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच नेतृत्वाने एव्हढी मनमानी केली असेल.
गांधी घराण्याच्या निवडक नि÷ावंतांची केवळ सोय करून सामान्य कार्यकर्त्याला आणि राज्यस्तरावरील नेत्यांना असे वाऱयावर सोडले असेल. ज्यांना उमेदवार बनवण्यात आलेले आहे त्यापैकी एखादाच सोनिया गांधींचा माणूस असेल. उरलेली नेतेमंडळी ही राहुल गांधींची अथवा प्रियंका गांधी वड्रांच्या शिफारशीने आलेली आहेत. मजेची गोष्ट अशी की काँग्रेस अध्यक्ष असूनदेखील सोनियांची डाळ शिजलेली नाही आणि त्यांच्या मुलांनी उच्छाद मांडून आपल्या लोकांना तिकिटे दिलेली आहेत.
पक्षापुढे अस्तित्वाचे संकट उभे ठाकले असताना काँग्रेसच्या प्रथम परिवाराने केलेले हे वर्तन किती चांगले अथवा किती वाईट ही गोष्ट अलाहिदा पण पक्षाच्या कार्यकर्त्यावर तसेच राज्यातील नेत्यांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. अशा गंभीर परिस्थितीत जर नेतृत्वालाच संघटनेविषयी चिंता नाही तर मग आम्ही का करावयाची. लोकसभा निवडणूक दीड-दोन वर्षावर आलेली असताना आपल्या होयबांना राज्यसभेवर आणण्याचा गांधी परिवाराचा डाव हा पक्षाला घातक ठरू शकतो.
गुजरातमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना सळो की पळो करून सोडणारा हार्दिक पटेल नुकताच भाजपमध्ये दाखल झाला. पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी मोदी-शहा यांच्यावर शेलक्मया शब्दात हल्ला करणारा हार्दिक भाजपमय का झाला? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस नेतृत्वाने शोधले पाहिजे. गुजरातमध्ये कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस लवकर सत्तेत येऊ शकत नाही हे गणित ठाम झाल्याने राज्यात पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष असलेला हार्दिक पक्ष सोडून गेला. येत्या काळात असे ‘हार्दिक’ प्रांताप्रांतांमध्ये बघायला मिळतील.
महाराष्ट्रात ज्या इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे त्यांच्याविषयी पक्षात कोणीही चांगले बोलत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी दिली होती तेव्हा त्यांचे अक्षरशः बारा वाजले होते. त्यांना केवळ काही हजार मते मिळाली होती. पंजाबमध्ये गेली दोनतीन वर्षे भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योतसिंग सिद्धूचे प्रस्थ माजले होते. प्रियांका आणि राहुल यांना त्यांनी काय मोहिनी घातली की त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आणि त्याचा परिणाम पक्ष सत्तेतून बाहेर फेकण्यात झाला. आता हा इम्रान उत्तर प्रदेशचा ‘सिद्धू’ आहे अशी कुजबुज पक्षात सुरु झाली आहे. महाराष्ट्राचा ‘उत्तर प्रदेश’ करण्याचा हा डाव दिसत आहे.
काँग्रेसमध्ये सत्तरी झाली, की नेत्यांनी निवृत्ती स्वीकारली पाहिजे असे एका दशकापूर्वी मानभावीपणे म्हणलेले माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी 69व्या वर्षात पदार्पण करूनही कर्नाटकमधून परत राज्यसभा मिळवली आहे याला काय म्हणावे. जयराम यांनी आयुष्यात एकही निवडणूक लढवलेली नाही. सोनिया गांधींची भाषणे लिहून ते कॅबिनेट मंत्रीदेखील झाले. दोन दशकांपूर्वी त्यांनी सोनिया म्हणजे ‘शिकलेल्या राबडीदेवी’ च आहेत अशी मुक्ताफळे उधळली होती पण सोनियांनी त्यांना माफ केले होते. राजीव शुक्ल आणि जयराम रमेश यांनी आयुष्यात एकतरी निवडणूक अगदी शाळा-कॉलेजातील देखील लढवली होती की नाही शंका आहे. पण अशाच लोकांची काँग्रेसमध्ये चलती आहे.
तात्पर्य काय तर राहुल आणि प्रियंकानी राजकीय सूज्ञता दाखवली नाही तर मरणोसन्न झालेल्या काँग्रेसचे हाल अजून खराब होणार आहेत हे सांगायला कोणा पंडिताची गरज नाही. राहुल हे नेते आणि कार्यकर्त्यांना फारसे भेटतच नाहीत या तक्रारी वाढू लागल्या असताना आता नवीन प्रकारच्या तक्रारिंना सुरुवात झाली आहे. त्या म्हणजे राहुल यांचे खासमखास मानले जाणारे नेतेदेखील फारसे कोणाला भेटत नाहीत.
मोदी-शहा यांनी गांधी घराण्याला अजून धक्का देण्याचा ठरवलेला दिसतोय. म्हणून तर ‘झी’चे सुभाष चंद्र, ‘इंडिया न्यूज’चे कार्तिकेय शर्मा असे बरेच अतिरिक्त उमेदवार वेगवेगळय़ा राज्यातून मैदानात उतरवले गेले आहेत. महाराष्ट्रातील भाजपचा तिसरा उमेदवार हा काँग्रेसला अपशकुन करण्यासाठीच आणलेला आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी आघाडीत काँग्रेस ही सर्वात ‘कमजोर कडी’ आहे. मोदी-शहा यांना तिला राष्ट्रीय राजकारणात सर्वात ‘कमजोर कडी’ बनवायचे आहे. ते यशस्वी झाले तर काँग्रेसची अवस्था ‘तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले’ अशी होईल.
काश्मीर खोऱयातून पंडित समाजाचे पलायनः
काश्मीर खोऱयात ज्या घटना घडू लागल्या आहेत त्या केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपकरता गंभीर आहेत. तिथून जोरदारपणे सुरु झालेले हिंदूंचे पलायन पक्षाला अपशकुन मानले जाते. ज्याप्रकारे हिंदूंच्या हत्या सुरु झाल्या आहेत त्याने काश्मिरी पंडित समाजात घबराट पसरली आहे आणि त्यातील बऱयाच जणांनी चंबूगबाळे आवरणे सुरु केले आहे. तेथील नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे अशा घटना का घडत आहेत त्याबाबत मूग गिळून गप्प आहेत. राजधानी दिल्लीमधील राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे, की सिन्हा यांना केव्हापासून सक्रिय राजकारणात परतायचे आहे पण पंतप्रधान त्यांना ‘अजून थोडी कळ धरा’ असे गेली वर्षभर सांगत आहेत.
काश्मीरमध्ये ज्या घटना घडतात त्याचे पडसाद साऱया देशभर उमटतात. केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी भाजपने केवळ काश्मीर मुद्याचा वापर केला आणि जेव्हा स्थानिक लोकांना सुरक्षा देण्याची निकड आहे तेव्हा राज्यकर्ते एका फिल्मचे (काश्मीर फाइल्स) प्रमोशन करण्यात गुंग आहेत. खोऱयामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधानांनी ताबडतोब पावले उचलणे गरजेचे आहे अशी मोहीम विरोधी पक्षांनी सुरु केली आहे. तीन वर्षांपूर्वी वादग्रस्त 370 कलम हटवून दहशतवादाला खतम् करण्याचे वातावरण आपण बनवले आहे असे डांगोरे पिटले गेले होते. जर दहशतवाद निपटला गेला असता तर काश्मीरी पंडितांचे पलायन परत सुरु झाले नसते.
असंतुष्ट भाजप नेते सुब्रमणियम स्वामी यांनी काश्मीरमधील परिस्थिती बिघडत असल्याने गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे अशी जाहीर मागणी केली आहे. शहा यांना नवीन खेळमंत्री बनवले पाहिजे असे स्वामींनी म्हटले आहे. सध्या खेळ क्षेत्रात बऱयाच घटना घडत असल्याने शहा हे खेळमंत्री म्हणून योग्य ठरतील असा स्वामींनी चिमटा काढला आहे. शहा यांचे चिरंजीव जय शहा हे अब्जावधी रुपयांचे बजेट असलेल्या क्रिकेट कंट्रोल बोर्डचे सर्वेसर्वा मानले जातात. जादुई घोषणा सोडून देत सरकारने काश्मीर खोऱयात शांती प्रस्थापित करण्यासाठी ठोस पाऊले उचलली नाहीत तर दहशतवादाची दलदल परत पसरेल अशी भीती व्यक्त होत आहे, ती सर्वस्वी अनाठायी नाही.
सुनील गाताडे