ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्याच्या राजकारणामध्ये आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंनंतर (Eknath Shinde) आता काँग्रेसमध्येही (Congress) काही आमदार बंडाच्या पवित्र्यात आहेत. यामध्ये काँग्रेसचा बडा नेता, तसेच १० आमदारांचा एक गट भाजपमध्ये सामील होणार असून यातील काहीजणांची शिंदे सरकारच्या कॅबिनेटमध्ये वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चांणा उधाण आलं आहे. काँग्रेसचा ज्येष्ठ नेता आणि ते १० आमदार कोण?, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं असून काँग्रेसला हा मोठा धक्का बसणार असल्याचं मानलं जात आहे.
दरम्यान, राज्यात दुसरा राजकीय भूकंपाची तयारी पूर्ण झाली आहे. काँग्रेसच्या दहा आमदारांचा एक गट भाजपमध्ये प्रवेश करतोय. बुधवारी अथवा गुरुवारी या गटाचा भाजप प्रवेश होईल, अशी माहिती मिळाली आहे.
शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर भाजपने आपलं लक्ष आता काँग्रेसकडे वळवले आहे. गेल्या वर्षभरापासून भाजप नेत्यांकडून काँग्रेस नेत्याशी संपर्क सुरू आहे. याला आता यश आले आहे. राज्यातील सहकार सम्राट विषेशतः शिक्षण सम्राट असलेल्या आमदारांचा या फुटीर गटात सहभाग असेल, अशी माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा : शिंदे गटातील शिवसेना पदाधिकाऱ्याची गळा आवळून हत्या, तलावात आढळला मृतदेह
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यांनतर या चर्चांना उधाण आलं आहे. आशिष कुलकर्णी यांच्या घरी ही भेट झाली आहे. यावेळी चव्हाण आणि फडणवीस यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
फुटीर आमदारामध्ये धुळे, सोलापूर, नांदेड, मुंबई उपनगर, कोल्हापूर या जिल्ह्यातील आमदारांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बरोबरच विधान परीषदेत संधी न मिळालेले आणि परीषदेत पराभूत झालेल्या एका मोठ्या नेत्याचादेखील समावेश असेल, अशी माहिती ही सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसमधून फुटून बाहेर पडणार्या आमदारांपैकी काही आमदार मुंबईच्या दिशेने निघाले आहेत, यांचा बुधवारी पक्षप्रवेश होईल, अशी माहिती समोर येत आहे.