पुणे / प्रतिनिधी :
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याबरोबरच, देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी आणण्यासाठी युवकांचा सहभाग वाढविला पाहिजे. त्याचबरोबर मतदारांनी भ्रष्टाचारी नेत्यांना खडय़ासारखे दूर ठेऊन निवडणुकीत कदापि निवडून देऊ नये, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे व्यक्त केली. नाना पटोलेंना अधूनमधून झटके येत नसल्याने त्यांचे बोलणे मनावर घ्यायचे नसते. काँग्रेसचे अस्तित्व राहिले नसल्यानेच ते प्रत्येक गोष्टीला विरोध करीत असल्याचा टोलाही त्यांनी कार्यक्रमानंतर बोलताना लगावला.
12 व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, देशाला मोठी परंपरा आहे आणि सभ्यतेचे प्रतिक म्हणून देशाकडे पाहिले जाते. हे लक्षात घेता युवा पिढीने विकसित आणि विश्वगुरूची संकल्पना जगासमोर पुन्हा एकदा आणावी. यामध्ये सर्वांचा सहभाग असावा. सोशल मीडियाच्या वापरामुळे तयार होणाऱ्या नकारात्मक भावनेला वेळीच आवार घालायला हवा. त्याचबरोबरच सकारात्मक भावनेतून देशाच्या बळकटीसाठी प्रयत्न करा.
अधिक वाचा : काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधी?, प्रस्ताव मंजूर
संसदेत, जनतेत कुठेच काँग्रेसला जागा राहिलेली नाही. त्यामुळे आपले अस्तित्व दाखविण्यासाठीच ते प्रत्येक मुद्दय़ावर भाजपावर टीका करीत आहेत. एखादा प्राणी नाहीसा झाला, तर त्याचा निसर्गचक्रावर परिणाम होतो. पंतप्रधान हे चक्र नियमित करण्यासाठी प्रयत्न करीत असतील, तर त्याचे स्वागत व्हायला हवे. मात्र, यातही राजकारण आणले जाणे, दुर्दैवी आहे. पटोले काहीही बरळत असतात, अशा शब्दांत फडणवीस यांनी निशाणा साधला.