सोनिया गांधी तटस्थ राहणार काँगेसच्या अंतर्गत निवडणुकांसंबंधी भूमिका घोषित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँगेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांसंबंधात आपण तटस्थ राहणार आहोत, असे प्रतिपादन काँगेस नेत्या सोनिया गांधी यांनी केले आहे. सध्या ही निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली असून ती समाधानकारकरित्या सुरु आहे. या प्रक्रियेत हस्तक्षेप केला जाणार नाही, असे त्यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
राजकीय वर्तुळात गांधींच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. सोनिया गांधी ‘तटस्थ’ राहणार, याचा अर्थ राहुल गांधी पुन्हा काँगेस अध्यक्ष होण्यास तयार नाहीत, असाही घेतला जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँगेसचा पुन्हा एकदा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडले होते. तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधी या केवळ कार्यकारी अध्यक्षा आहेत. तथापि, त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या पक्षावर लक्ष केंद्रित करु शकत नाहीत, असे बोलले जाते. कूँग्रेसचा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रीया लवकरच सुरू होत असून राहुल गांधी मैदानात न उतरल्यास शशी थरुर विरुद्ध अशोक गेहलोत अशी लढत रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँगेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याचे खासदार शशी थरुर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी या संदर्भात सोनिया गांधी यांची भेटही घेतली होती. त्यांच्या उमेदवारीला गांधींनी होकार दिला होता. त्यांच्या विरोधात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उभे राहण्याची शक्यता आहे. बऱयाच वर्षांनंतर अशा प्रकारे काँगेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जात आहे.
इतरही इच्छुक
शशी थरुर आणि अशोक गेहलोत यांच्या समवेत मल्लिकार्जुन खर्गे, मुकुल वासनिक, कुमारी सेलजा, के. सी. वेणुगोपाल, दिग्विजय सिंग इत्यादी नेतेही अध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेत आहेत, असे बोलले जाते. तथापि, त्यांचा प्रभाव फारसा मानला जात नाही. निवडणूक झालीच तर ती थरुर विरुद्ध गेहलोत अशीच होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, राजस्थान आणि तामिळनाडू या पाच राज्यांच्या काँगेस शाखांनी राहुल गांधीच पुन्हा अध्यक्ष व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अद्यापही चित्र धूसर आहे.
गेहलोत यांच्या अटीमुळे कोंडी ?
काँगेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास गेहलोत तयार आहेत. मात्र, त्यांनी यासाठी एक पेचयुक्त अट घातली आहे, असे बोलले जाते. आपण काँगेस अध्यक्षपदाचे उत्तरदायित्व स्वीकारु पण सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्रीपद देता कामा नये. ते पद ज्येष्ठ नेते सी. पी. जोशी यांना द्यावे, अशी ही अट आहे. पण गेहलोत यांच्यानंतर पायलट यांनाचे हे पद दिले जाईल असे आश्वासन काँगेस श्रेष्ठींनी पायलट यांचे बंड थंड करताना दिले होते. ते पूर्ण न केल्यास पायलट कमालीचे नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची कोंडी या अटीमुळे झाल्याचे स्पष्टपणे बोलले जात आहे. आता सोनिया गांधी नेमके काय करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थात, गेहलोत यांची ही अट अधिकृतरित्या समोर आलेली नाही. पण त्यांची पायलट यांच्यावरील नाराजी अद्याप दूर झालेली नाही, हे मात्र,यावरुन स्पष्टपणे दिसून येते असे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.
24 पासून अर्ज सादर होणार
काँगेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ केला जाणार आहे. ही माहिती पक्षाचे निरीक्षक मधूसुदन मिस्त्री यांनी दिली. त्यामुळे 24 पासूनच खरे चित्र दिसण्यास प्रारंभ होईल. राहुल गांधी निवडणूक लढविणार की नाही, याचाही निर्णय 24 नंत्?ारच होणार आहे. कदाचित 26 सप्टेंबरला अशोक गेहलोत उमेदवारी अर्ज सादर करण्याची शक्यता आहे. आमदारांच्या बैठकीनंतर यासंबंधी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.