पुणे / प्रतिनिधी :
खासदार राहुल गांधी यांचे ‘भारत जोडो’ अभियान अंतिम टप्प्यात असताना आता 26 जानेवारीपासून 26 मार्चपर्यंत देशभर ‘हाथ से हाथ जोडो’ हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात देशभर नागरिकांमध्ये महागाई, बेरोजगारीविषयी तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या अभियानात सामील करून घ्यावे व हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा महाराष्ट्र काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल यांनी केले. महाराष्ट्रात काही ठिकाणी मित्रपक्षांमुळे काँग्रेसचे नुकसान झाले असून, वेळप्रसंगी स्वतंत्र लढण्याचीही तयारी ठेवावी लागेल, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
नवी सांगवी येथे शहर काँग्रेसची आढावा बैठक झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी संजय राठोड, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष शामला सोनवणे, माजी आमदार दीप्ती चवधरी, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्याम उमालकर, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सोनल पटेल म्हणाल्या, हे अभियान ब्लॉक आणि बूथ स्तरापर्यंत राबवून नागरिकांच्या घरोघरी जाऊन खासदार राहुल गांधी यांनी दिलेले पत्र त्यांना द्यायचे आहे. यापूर्वी डिजिटल नोंदणी करून सभासद झालेल्या सदस्यांनादेखील सामावून घेतले जावे. युवक काँग्रेसने प्रत्येक प्रभागात दुचाकी रॅली काढून जनजागृती करावी. तसेच महिला कार्यकर्त्यांनीदेखील विविध क्षेत्रातील महिलांशी संपर्क साधून काँग्रेसची ध्येयधोरणे घरोघरी पोहोचवावीत. हे अभियान महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना उपयोगी ठरेल. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने व्हिजन डॉक्मयुमेंट तयार करून सर्वांनी एकोप्याने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करावे आणि काँग्रेसचे संघटन मजबूत करावे, असे सोनल पटेल यांनी सांगितले. 27 फेब्रुवारीला चिंचवड विधानसभा निवडणुकीचे मतदान आहे. या जागेवर काँग्रेसने उमेदवार उभा करावा, अशी आपली सर्वांची भावना आहे, या बैठकीतील मत मी पक्षश्रेष्ठींपुढे मांडेन. पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो सर्वांनी पाळावा, असेही त्यांनी सांगितले.
मित्रपक्षांमुळे काही ठिकाणी काँग्रेसचे नुकसान
महाराष्ट्रात मित्र पक्षांबरोबर राहिल्यामुळे काही ठिकाणी काँग्रेसचे नुकसान झाले आहे. तिथे आता लक्ष देऊन काँग्रेसचे संघटन वाढवण्यासाठी काम केले जाईल. वेळप्रसंगी पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले, तर स्वतंत्र लढण्याचीदेखील तयारी करावी लागेल, असे सोनल पटेल यांनी सांगितले.
पटोलेंच्या हस्ते ‘हाथ से हाथ जोडो’चा सोमवारी शुभारंभ
डॉ. कैलास कदम म्हणाले, चिंचवड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार उभा करावा, असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. ही निवडणूक लढण्यासाठी दोन महिला आणि चार पुरुष पदाधिकारी इच्छुक आहेत. या ठिकाणी पूर्वी काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवली आहे. सोमवारी पुण्यामध्ये समताभूमी येथे हाथ से हाथ जोडो या अभियानाचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहून चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी आग्रह धरणार आहेत.