हिंडनबर्ग अहवालाची पार्श्वभूमी ः केंद्र सरकारवर काँग्रेसचे टीकास्त्र
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिग्गज उद्योगपती गौतम अदानी सध्या अत्यंत चर्चेत आहेत. हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यावर गौतम अदानी वादात सापडले आहेत. याप्रकरणी आता राजकारण देखील सुरू झाले आहे. विरोधी पक्षाने या प्रकरणावरून केंद्र सरकारच्या विरोधात टीका चालविली आहे. काँग्रेसने संसदेनंतर आता रस्त्यांवर उतरून निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.
अदानी समुहाच्या विरोधात देशव्यापी निदर्शने करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या पैशाचा वापर स्वतःच्या मित्रांच्या मदतीसाठी करत आहे. काँग्रेस पक्षाला याला विरोध असून आता सोमवारी एलआयसी आणि एसबीआयच्या कार्यालयांबाहेर देशभरातील जिल्हय़ांमध्ये निदर्शने करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले आहे.
केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष सोमवारी रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यावर सर्वच विरोधी पक्ष एकजूट होत केंद्र सरकारला लक्ष्य करत आहे. अदानी समुहाचे समभाग कोसळण्यामागे महाघोटाळा कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.
काँग्रेसनकडून प्रश्न उपस्थित
काँग्रेस पक्षाने याप्रकरणी दररोज तीन प्रश्नांची एक सीरिज सुरू केली आहे. याला ‘हम अदानी के है कौन?’ असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. अदानी महाघोटाळय़ाप्रकरणी पंतप्रधानांच्या मौनाने आम्हाला हे प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडले आहे. आम्ही दररोज तीन प्रश्न पंतप्रधानांना विचारणार आहोत असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. त्यांनी पहिला प्रश्न गौतम अदानींचे बंधू विनोद अदानी यांच्याशी संबंधित उपस्थित केला आहे. तर दुसऱया प्रश्नात गौतम अदानींवर ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाकडून कुठली कारवाई करण्यात आली अशी विचारणा करण्यात आली आहे.