महागाईविरोधी रॅलीत राहुल गांधींचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोणीही कितीही दबाव आणला तरी काँगेस पक्ष महागाई आणि बेरोजगारी विरोधातील आपला संघर्ष सुरु ठेवणार आहे. आम्ही कोणालाही घाबरत नाही. 2014 नंतर देशात केवळ विद्वेष आणि तिरस्कार यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे, अशी टीका काँगेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ते पक्षाने आयोजित केलेल्या महागाई विरोधातील सभेत भाषण करीत होते. काँगेसच्या भारत जोडो यात्रेचा प्रारंभही त्यांनी यावेळी केला. ही यात्रा दोन महिने चालणार आहे.
‘महंगाईपर हल्ला बोल’ असे या सभेचे घोषवाक्य होते. गांधी यांनी भाषण करताना केंद्र सरकारवर तोंडसुख घेतले. महागाई आणि बेरोजगारी ही या सरकारची भावंडे आहेत. केवळ काँगेसचा कार्यकर्ताच या स्थितीत देशाला वाचवू शकतो. काँगेस पक्षच देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. या सभेत अनेक ज्येष्ठ काँगेस नेत्यांचा सहभाग होता.
विरोधकांचा आवाज दाबला
संसदेत विरोधी पक्षांना बोलू दिले जात नाही. आमचा आवाज दाबला जातो. त्यामुळे आम्हाला थेट लोकांसमोर येऊनच बोलावे लागते. आम्ही लोकांना सत्य सांगण्यासाठी येथे उभे आहोत. लोकांनी ते ऐकावे अशी आमची इच्छा आहे. याचसाठी आम्ही भारत जोडो यात्रेचा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या देशात विद्वेषाचे वातावरण आहे. ते निवळण्यासाठी भारत जोडो यात्रा हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
संघावरही टीका
पंतप्रधान मोदी आणि भाजपवर शरसंधान करण्याच्या ओघात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. संघाच्या तत्वज्ञान समाजात फूट निर्माण करते. असे तत्वज्ञान भारतासाठी उपयुक्त नाही. त्यामुळेच काँगेसने भारत जोडो यात्रा करण्याचा संकल्प सोडला असून देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचा आमचा हेतू आहे, अशी मांडणी त्यानी आपल्या भाषणात केली.
भाजप सत्तेवर आल्यापासून...
भाजप सत्तेवर आल्यापासून देशातील वातावरण बदलले आहे. सद्भावनेची जागा आता वैमन्याने घेतली आहे. समाजा-समाजांमध्ये फूट पडली आहे. प्रशासन यंत्रणा चालविणाऱया विविध संस्थांवर दडपण आणण्यात येत आहे. यात न्यायपालिका, निवडणूक आयोग, प्रसारमाध्यमे यांच्या या संस्थांमध्ये समावेश आहे. सध्या भारतील मिडिया केवळ दोन औद्योगिक घराण्यांच्या ताब्यात आहे आणि ही घराणी भाजप सरकारची लाभार्थी आहेत. त्यामुळे मिडियावरही विरोधी पक्षांना म्हणावे तसे स्थान मिळत नाही, अशा अर्थाची विधाने त्यांनी भाषणात केली.
महागाईमुळे द्वेष
महागाई आणि बेरोजगारी यामुळे लोक संत्रस्त झाले आहेत. याचा राग ते एकमेकांवर काढत आहेत. त्यामुळे देशात संघर्षमय वातावरण आहे, अशा अर्थाची मीमांसाही त्यांनी केली. असहय़ करणारी महागाई आणि बेरोजगारी वाढण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले.
आटय़ाचा भाव 40 रुपये ‘लीटर’
पंतप्रधान मोदी यांच्या काळात महागाई कशी वाढली आहे, हे पटवून देण्याच्या ओघात त्यांनी काही वस्तूंचे दर नमूद केले. त्यात आटय़ाचा भाव सध्या 40 रुपये प्रतिकिलो आहे असे त्यांना म्हणायचे होते. तथापी, चुकून त्यांनी आटय़ाचा भाव 40 रुपये लीटर असे सांगितल्याने तो सोशल मिडियावर गाजलेला विषय ठरला.
भारत जोडो यात्रा
देशात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण व्हावे म्हणून भारत जोडो यात्रा काढण्याचे ठरले आहे, असे काँगेसच्या वतीने सांगण्यात आले. ही यात्रा काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत चालणार आहे. ती पदयात्रेच्या स्वरुपात असेल, अशी माहिती काँगेसच्या कार्यालयाने दिली. या यात्रेत काँगेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात रहावा, यासाठी देशपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.