राहुल गांधींच्या चौकशीवरून विविध राज्यात गेंधळ : पोलिसांकडून लाठीमार, पाण्याच्या फवाऱयांचा वापर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तीन दिवसात 30 तास चौकशी करण्यात आली. ईडीने गुरुवारी त्यांच्या चौकशीला ‘अर्धविराम’ दिला असला तरी शुक्रवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. आता ईडी राहुल गांधींना अटक करू शकते, असे काँग्रेसला वाटू लागले आहे. अशा स्थितीत पक्षाकडून गुरुवारी देशभरात निदर्शने करण्यात आली. बहुतांश राज्यांमध्ये राजभवनांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनादरम्यान निदर्शकांना पांगवण्यासाठी पाण्याच्या तोफा आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आल्याने काही ठिकाणी तणावही निर्माण झाला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये टायर पेटवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्याचवेळी ईडीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांनी पोलीस कर्मचाऱयाशी गैरवर्तन करत त्यांची कॉलर ओढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे काँग्रेस आंदोलकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आंदोलनादरम्यान गुरुवारी ताब्यात घेतलेल्या सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या 8 वर्षांपासून सातत्याने सर्व यंत्रणांचा गैरवापर करून नेत्यांचा आवाज दाबला जात आहे. हा एजन्सींचा गैरवापर थांबवण्यासाठी आम्ही गांधीवादी मार्गाने सत्याग्रह करून सरकारवर दबाव आणू, असे पायलट म्हणाले. दुसरीकडे, राज्यसभा खासदार दीपेंद्र हुडा यांना दिल्ली पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे.
काँग्रेसचे आंदोलक जयपूरमधील राजभवनाला घेराव घालणार होते. मात्र तेथे कलम 144 लागू करण्यात आल्याने काँग्रेसतर्फे सिव्हिल लाईन्सच्या गेटवरच आंदोलन करण्यात आले. यादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांच्यासह अनेक नेते बॅरिकेड्सवर चढले. आता शुक्रवारी काँग्रेस सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी निदर्शने करणार आहे. केरळमधील तिरुअनंतपूरम येथे निदर्शक काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या तोफांचा वापर केला. तसेच अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या.