प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची टीका
प्रतिनिधी/ कुडचडे
राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासह भाजपचे नवे आमदार दिगंबर कामत आणि आलेक्स सिकेरा यांनी गोव्यातील विविध किनाऱयांवरून गोळा केलेल्या प्रचंड कचऱयाने समुद्रकिनारे स्वच्छता कंत्राट हा घोटाळा असल्याचा काँग्रेस पक्षाने याअगोदर केलेला दावा परत एकदा खरा ठरवला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.
दिगंबर कामत आणि आलेक्स सिकेरा या नवीन भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे समुद्रकिनारे स्वच्छता कंत्राट रद्द करण्याची आणि राज्याचे जवळपास 60 कोटी वाचवण्याची मागणी करावी, असे आवाहन पाटकर यांनी केले आहे. कारण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह इतरांनी गोव्यात ‘क्लीन कोस्ट, सेफ सी’ मोहिमेच्या अंतर्गत विविध किनाऱयांवरून प्रचंड कचरा गोळा केल्याचे धक्कादायक दृष्य आज गोमंतकीयांनी पाहिले आहे, यावरून सरकारने नियुक्त केलेले समुद्रकिनारे सफाई कंत्राटदार काहीही करत नसल्याचे सिद्ध होते. असे त्यांनी म्हटले आहे.
गोवा लोकायुक्तांनी दोन कंत्राटदारांकडून झालेल्या किनारे सफाई घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दिलेल्या एका कंत्राटातही असाच घोटाळा झाल्याचे आढळून आले होते. सध्याचा ठेकेदारही कोणतेही काम करत नसल्याने गोव्यातील विविध समुद्रकिनाऱयांवर कचऱयाचे ढीग साचले आहेत. त्यामुळेच आज सगळीकडे कचरा गोळा झाला असून हे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच निदर्शनास आणून दिले आहे, असा दावा पाटकर यांनी केला आहे.
यामुळे मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, दर आठवडय़ाला अशा प्रकारच्या मोहिमेचे आयोजन करावे आणि स्थानिक पंचायतींना समुद्रकिनारा स्वच्छतेच्या कामात सहभागी करून घ्यावे. ते काम प्रभावीपणे करतील आणि आमचे किनारे देखील स्वच्छ राहतील. भाजप सरकारने मुंबईतील दोन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यापूर्वी आमचे गोव्याचे कंत्राटदार वर्षाला केवळ 3 कोटी रु. घेऊन किनारे स्वच्छ करण्याचे काम करत होते, याची आठवण पाटकर यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे.