नैर्त्रुत्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांचा विश्वास : इराण्णा कडाडी यांनी विविध विषयांवरही केली चर्चा
प्रतिनिधी /बेळगाव
मिरज ते लोंढा यादरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दुपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील पॅसेंजर रेल्वे बंद ठेवण्यात आल्या आहेत. दुपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण होताच पॅसेंजर गाडय़ा सुरू करण्याविषयी रेल्वे बोर्डचे संचालक व अधिकाऱयांशी चर्चा सुरू आहे. 15 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण झाल्यास पॅसेंजर सुरू केली जाईल, असा विश्वास नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव किशोर यांनी व्यक्त केला.
बेळगावचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी व घटप्रभा-गोकाक परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या शिष्टमंडळाने सोमवारी हुबळी येथे संजीव किशोर यांची भेट घेतली. यावेळी पॅसेंजर सुरू करण्याबाबत मागणी करताच हे उत्तर दिले. या बैठकीत बेळगाव जिल्हय़ातील रेल्वेच्या विविध प्रश्नांवर तसेच सुरू असणाऱया विकासकामांवर चर्चा करण्यात आली.
बेळगाव-मिरज या मार्गावरील पॅसेंजर रेल्वे मागील अडीच वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱया प्रवाशांचे हाल होत आहेत. पॅसेंजर सुरू केल्यास सर्वसामान्य प्रवाशांना अत्यल्प दरामध्ये प्रवास करता येत असल्याने पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली. यावर सरव्यवस्थापकांनी काम सुरू असल्याचे कारण पुढे केले. त्यावर खासदारांनी मिरज ते लोंढा या दरम्यान किमान एकतरी पॅसेंजर सुरू करा, अशी मागणी लावून धरली. यावेळी हुबळी विभाग बोर्डचे माजी सदस्य घटप्रभा येथील सुरेश पाटील, मल्लाप्पा हुक्केरी, पत्रकार सुभाष गायकवाड, गणेश गाणीग, चन्नबसव अंगडी, मल्लिकार्जुन गोरानी, राजू बगदादी, फैयाज शेख, प्रभू शिवापुरे, अनिल मेस्त्री उपस्थित होते.
बेळगाव-पंढरपूर मार्गावर विशेष रेल्वे सोडा
हुबळी, बेळगाव या जिल्हय़ांमध्ये मोठय़ाप्रमाणात वारकरी आहेत. आषाढी एकादशीला वारकरी मोठय़ा संख्येने पंढरपूरमध्ये दाखल होतात. त्यामुळे बेळगाव-पंढरपूर मार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तर सध्या सुरू असणाऱया यशवंतपूर-पंढरपूर या रेल्वेला घटप्रभा येथे थांबा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली. याविषयी बोलताना सरव्यवस्थापक म्हणाले, यापूर्वी विशेष रेल्वेची मागणी केली असती तर सोडता आली असती. पंढरपूरसाठी विशेष रेल्वेची मागणी न झाल्याचे उत्तर त्यांनी नागरिकांना दिले.